479 पैकी 300 हून अधिक जागांवर सेनेचा दावा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यातील सत्तेची समीकरणे बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रत्नागिरी जिल्हय़ातील निवडणूक होणाऱया 479पैकी 119ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडी झाल्या होत्या. त्यामुळे 360 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेनेने आपला वरचष्मा कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीविरोधात स्वतंत्रपणे लढणाऱया भाजपाने आपले काही गड गमावले असले तरी काही गडांवर चंचूप्रवेश करण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादीनेही आपले बालेकिल्ले जपले आहेत मात्र काही भागात मित्रपक्ष शिवसेनेनेच राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. मनसेनेही काही भागात आपले खाते उघडले आहे. जिल्हय़ात काँग्रेस व कुणबी आघाडीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
गावगाडय़ाचा कारभारी होण्यासाठी गेला महिनाभर उमेदवारांसह राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 479 पैकी 360 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात मतदान झाले. महाविकास आघाडीमुळे सेनेच्या जागा वाढणार, असा विश्वास सेना पदाधिकाऱयांना होता मात्र अंतर्गत गटबाजीमुळे काही गणिते फिस्कटली. याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला व काही ठिकाणी आपले अस्तित्व जपण्यात यशही मिळवले. तरीही जिह्यात सेनेचाच वरचष्मा कायम राहिला आहे. जिल्हय़ातील सुमारे 300 ग्रामपंचायतींमध्ये सेनेने वर्चस्व मिळवले आहे.
रत्नागिरीत बंडखोरांना दणका
रत्नागिरी तालुक्यात कर्ला व गोळप ग्रामपंचायतीकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिले होते. कर्ला येथे 13 पैकी 11 तर गोळपमध्ये 15 पैकी 14 जागा बंडखोरांना नमवत शिवसेना पुरस्कृत पॅनलने जिंकल्या. 15 वर्षाची भाजपची मक्तेदारी मोडीत काढत चांदेराई ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकावला आहे. कोतवडे, दांडेआडोम येथेही भाजपाला धक्का बसला आहे. मात्र सडामिऱया, राई येथे वरचष्मा राखतानाच काळबादेवी, नांदिवडे येथे भाजपाने काही जागांवर विजयही मिळवला आहे. आमदार व विद्यमान मंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील ‘नवे-जुने’ वादालाही लगाम घालण्यात यश मिळवले आहे. भाजपाने स्वतंत्र व गावपॅनेलच्या माध्यमातून 9 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
चिपळुणात आघाडीतच शीतयुध्द
चिपळूण तालुक्यात आमदार शेखर निकम यांचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले अस्तित्व आहे. यामुळे आघाडी असूनही अंतर्गत लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वर्चस्वाचीच होती. यात मोक्याच्या जागा राष्ट्रवादीकडे कायम राखण्यात निकम यांना यश आले असले तरी सुमारे 14 ग्रामपंचायतींमध्ये सेनेनेच राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शौकत मुकादम यांनी आपल्या भागातील राष्ट्रवादीची सत्ता टिकवण्यात यश मिळवले आहे. चिपळूण तालुक्यात भाजपाला आपले अस्तित्व दाखविण्याची फारशी संधी मिळालेली नाही.
देवरुखात सेनेला फटका
जिल्हय़ातील रत्नागिरी, खेड, लांजा, मंडणगड, दापोली, राजापूर व गुहागर तालुक्यात सेनेने बहुमत सिध्द केले. फक्त देवरूखमध्ये सेनेच्या काही जागा पहिल्यांदाच कमी झाल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी गतवर्षीपर्यंत 62 पैकी 59 ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व होते. यंदा यात घट होत केवळ 27 ग्रामपंचायतीवर सेना उमेदवारांनी वर्चस्व राखले आहे. भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे. देवरूख वगळता तालुक्यात अन्यत्र सेनेला अपेक्षित यश मिळाले आहे. साखरपा परिसरात सेनेने एकहाती वर्चस्व राखले आहे.
लांजात भाजपा, गावपॅनेलचे सेनेला आव्हान
लांजा तालुक्यात सेनेचे आमदार असतानाही काही भागात भाजपाने तर काही भागात गाव पॅनेलने सेनेसमोर आव्हान निर्माण केले होते. यामुळे 23 पैकी केवळ 11 ग्रामपंचायतींवरच सेनेला समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने 2 ठिकाणी वर्चस्व राखले आहे तर 9 ठिकाणी गाव पॅनेलने बाजी मारली आहे. रावारीत भाजपाने तर अंजणारीत काँग्रेसने सेनेला रोखले आहे. भांबेड, पालू, साटवली या सेनेच्या गडात भाजपाने शिरकाव केला आहे. मनसेनेही काही भागात अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे.
राजापूरात काँग्रेस शून्यावर
जिल्हय़ातील लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघ क्षेत्रात शिवसेनेने बाजी मारली आहे. राजापूरमध्ये 34, लांजा 12 आणि साखरपा 9 अशा 55 ग्रामपंचायती व राजापूर आणि लांजातील प्रत्येकी 6 अशा 12 ग्रामपंचायतीमधील गाव पॅनल शिवसेनेकडे येणार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. काही प्रमाणात काँग्रेस शिल्लक असलेला भाग म्हणून राजापूरचा उल्लेख होतो मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. सेनेला धक्का देत कोंडसर, शीळ, रायपाटणसह 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व राखले आहे. राजापूर तालुक्यात 61 सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे मनसेचे 16 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने केवळ एका ठिकाणी सत्तेपर्यंत मजल मारली आहे. हुलकावणी देणाऱया दोनिवडे, ओशीवळेत सेनेने बाजी मारली आहे.
खेडात मनसेची टक्कर
खेड तालुक्यातील 45पैकी 35 ग्रामपंचायतींत सेनेने सत्तेला गवसणी घातली असली तरी काही भागात मनसेने सेनेला चांगले झुंजवले. भरणेत राष्ट्रवादीने सेनेला तर भडगावात सेनेने मनसेला धक्का दिला आहे. 10 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला दावा सांगितला आहे. मनसेने एका ग्रामपंचायतीत वर्चस्व राखतानाच 7 ठिकाणी खाते उघडले आहे.
गुहागरात भाजपा-राष्ट्रवादी हातमिळवणी
गुहागर तालुक्यात मतदान झालेल्या 16 पैकी 10 ग्रामपंचायतींमध्ये सेनेने तर 4 ठिकाणी गावपॅनेल्स व प्रत्येकी एका ग्रामपंचायतींमध्ये भाजपा व राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. काही ठिकाणी भाजपा व राष्ट्रवादीची झालेली हातमिळवणी चर्चेचा विषय ठरली आहे. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती कोणाच्या अधिपत्याखाली जातात हे सरपंच निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
दापोलीत राष्ट्रवादीला गळती
दापोली तालुक्यात 57 पैकी 40 ग्रामपंचायती ताब्यात आल्याचे सेनेने म्हटले आहे. राज्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला रोखण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. त्याचवेळी भाजपा, दळवी गट व अन्य असंतुष्टांवर सेनेने सहज मात केली आहे. राष्ट्रवादीला आपली ताकद दाखविण्याची महत्त्वपूर्ण संधी हुकली असून उलट मोठा फटकाच बसल्याचे दिसून येत आहे.
मंडणगडात सेनेचा राष्ट्रवादीला धक्का
मंडणगडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 जागा सेनेकडे आल्या आहेत. दापोलीत 56 पैकी 40 ग्रामपंचायतीवर सेनेचे उमेदवार निवडून आले आहेत, धक्कादायक बाब म्हणजे मनसेच्या एका तरूण उमेदवारांने शिवसेना विभाग प्रमुखांचा दारूण पराभव केला, आणि मनसेचे खाते उघडले आहे. महाविकास आघाडी बाजूला सारत या तालुक्यात सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच वर्चस्वाची लढाई झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सदस्यसंख्येसह मतदानाची टक्केवारीही सेनेच्या बाजुनेच झुकली आहे.