वार्ताहर/ मौजेदापोली
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्हय़ाच्या तापमानात कमालीची वाढ होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 3 मार्चपर्यंत कमाल व किमान तापमानात वाढीचे संकेत हवामान विभागाकडून आधीच देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी फळांची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केले आहे.
यामध्ये 2 मार्च रोजी कमाल 39, तर किमान 21, 3 मार्च रोजी कमाल 38 तर किमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. निसर्ग चक्री वादळानंतर अवकाळी पाऊस, त्यानंतर गायब झालेली थंडी अशा संकटांनंतर अचानक उन्हाळ्याची तीव्रता वाडे लागल्याने शेतकरी पुन्हा काळजीत पडले आहेत.
पुढील पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट संभवत असल्याने वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता आहे. यासाठी आठवडय़ातून एकदा प्रतिझाड 100 लिटर पाणी किंवा 15 दिवसातून एकदा 150 ते 200 लिटर पाणी प्रतिझाड याप्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. फळगळ कमी करणष व प्रत सुधारण्यासाठी 1 टक्का पोटॅशियम नायट्रेटची (10 ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत अशा तीन फवारण्या कराव्यात. फळगळ कमी करण्यासाठी, फळाचा आकार व वजन वाढून डागविरहीत फळांसाठी आणि फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी 25 बाय 20 सें. मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. बागेमधील गळलेली फळे नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी रक्षक सापळे प्रतीएकरी 2 याप्रमाणात टांगावेत. 6 ते 7 आठवडय़ानंतर सापळ्यात 2 ते 3 मि.ली. घालावे, असे सांगण्यात आले आहे.
काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱया अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफोस 15 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या वाल पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाल पिकामध्ये शेंगा पोखरणाऱया अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त शेंगा नष्ट कराव्यात व 5 टक्के निबोळी अर्क किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 20 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात, असे सांगण्यात आले आहे. तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडाना 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी व पूर्ण वाढलेल्या माडांना 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
तापमानात वाढ आणि आर्द्रतेत घट संभवत असल्याने वेलवर्गीय पिकांना 5 ते 6 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. वेलवर्गीय फळांवर फळमाशी नियंत्रणासाठी फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून प्रतीएकरी दोन ‘क्युल्युर’ रक्षक सापळे लावावेत. वांगी पिकाला 5 ते 6 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱया अळी नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंडे व फळे नष्ट करावीत आणि डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जनावरांच्या शरिराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलकप्रमाणात देण्यात यावे. वैरणीवर 1 टक्के गुळपाणी आणि 0.5 टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करून शिंपडावे. दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. कोंबडय़ांचे उष्णतेपासून संरक्षण करावे. कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी व पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात ठेवावे, असे विद्यापीठाने जारी केलेल्या कृषी सल्ला पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
ऊनाचे चटके वाढणार
शहरामध्ये काही दिवसात तापमान 33 अंश सेल्सिअस वरुन तब्बल 37 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रत्नागिरीमध्ये वाऱयाचा वेग कमी होण्याची शक्यता असून आर्द्रतेमध्येसुध्दा घट होऊ शकते अशी शक्यता स्काय मेट या संकेतस्थळाने वर्तवली आहे.
थोडय़ाच दिवसात तापमान कमाल 33 अंश व किमान 22 अंश सेल्सिअस वरून कमाल 37 अंश व किमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसेच आर्द्रता 83 टक्क्यांवरून तब्बल 59 टक्क्यांवर येऊन ठेपणार असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाऱयाचा वेग 11 किमी प्रति तासांवरून 6 किमी प्रति तासांवर येऊन ठेपणार आहे.
अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती असल्याने हवेतील बाष्प ओढून घेतले आहे. यामुळे कोकण किनारी भागातील हवामान कोरडे झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यातच थंडीचा प्रभावही कमी होऊ लागला आहे. पुढील काही दिवस थंडी हळूहळू कमी होऊन किमान तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरात सोमवारी 22 अंश सेल्सिअस किमान आणि 35 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.