मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या दोन आठवडय़ात रूग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूदर रोखण्यात रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाला यश येत आहे. जिल्हय़ाचा मृत्यूदर 3.45 वरून 2.35 वर आला आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांना जाते. त्यांनी दिवस-रात्र घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
येथील पॉलिटेक्नीक कॉलेजमधील आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढती दिसत असली तरी यामध्ये वेळेवर उपचारासाठी पुढे येणाऱया रूग्णांची संख्या अधिक आहे. पूर्वी लोक स्वत:हून दाखल होताना दिसत नव्हते. आता मात्र काही लक्षणे आढळल्यास त्वरित नागरिक तपासणीसाठी पुढे येत आहेत. यामुळे वेळेत उपचार होत आहे. तसेच या बाबत आरोग्य विभागाने चांगली जनजागृती केल्याने याचा चांगला परिणाम दिसून आला. परिणामी मृत्यूदर आटोक्यात येत आहे. मृत्यू दराचा टक्का आणखी कमी कसा करता येईल, या दृष्टीने आरोग्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचेही मंत्री सामंत यांनी दिली. गेल्या महिन्यापर्यंत बरे होण्याचा टक्का हा 57 टक्के होता. आता तो 65 टक्क्यांवर आला आहे. ही देखील बाब जिल्हय़ासाठी दिलासादायक असल्याचे सामंत यांनी सांगितले.
डॉ. बोल्डे यांच्याकडे कोरोनाची महत्वाची जबाबदारी
सिव्हील सर्जनपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळय़ा बातम्या येत आहेत. या संदर्भात आपण डॉ. बोल्डे आणि डॉ. फुले यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. दोघांमध्ये चांगला संवाद आहे. शासकीय रूग्णालयाचे कामकाजही सुरळीत सुरू असून सध्या डॉ. बोल्डे यांना कोरोना रूग्णांबाबत एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेमक काय झाले आहे, याबाबत आपण जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करणार आहोत. हा विषय लवकरच मार्गी लागेल. कोरोना काळात शासनाने सगळे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. त्यामुळे या विषयावर त्यांच्याशी चर्चा करेन, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.