आठवडाभर कोसळणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सलग दुसऱया आठवडय़ात जिल्हय़ात मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्हय़ातील अनेक भागात विशेषतः दापोली, मंडणगड तालुक्यात घरांची पडझड व दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. तर गुहागरमधील वेलदूर सिध्देश्वर रस्ता पूर्णपणे खचला तसेच कुरधुंडा खुर्द येथील हसनशेठ दाऊद शाळेजवळ मोठा दगड खाली आल्याने शाळेच्या भिंतीला भेग पडली आहे. कोणतीही जीवित व मोठी वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र सकाळी 11 नंतर पुन्हा मुसळधार पावसाने सुरूवात केली. सायंकाळपर्यंत तो धुवाँधार कोसळत होता. रत्नागिरी शहरातील अनेक सखल भागात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हवामान खात्याने पुढील आणखी 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. शेतकऱयांना दिलासा मिळाला असला तरी अतिपाऊस भातपीकासाठी नुकसानकारक ठरण्याची भीतीदेखील आहे.
गेल्या 8 दिवसांपासून जिल्हय़ात पावसाचे थैमान सुरु आहे. रत्नागिरी जिल्हय़ात जुलै महिन्यातच पावसाने 2 हजार मिमिच्या सरासरीचा आकडा गाठला आहे. अजून जुलै महिन्याचे 10 दिवस बाकी असताना 1 जूनपासून आजपर्यंत 1939 मिमिचा टप्पा पार झाला आहे.
सतत कोसळणाऱया पावसामुळे शेतकरीवर्गाला गेल्या आठवडय़ात काहीसा दिलासा मिळाला व लावणी चांगल्या पध्दतीने पार पडली. मात्र आता 24 तास कोसळणाऱया पावसामुळे जिल्हय़ातील जनजीवन विस्कळीत झाले असून या आठवडय़ात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. एका आठवडय़ात तीनवेळा ‘रेड झोन’मध्ये जिल्हा होता. आणखीन दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुन्हा दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी
रत्नागिरी जिल्हय़ात पाऊस सातत्याने कोसळत असून गेल्या 24 तासात जिल्हय़ात 102 मिमि पावसाची नोंद झाली आहे. जिल्हय़ातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने मंगळवारपासून पुढील 2 दिवस जिल्हय़ाला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.