वार्ताहर / जैतापूर
राजापूर तालुक्यातील डोंगर तिठ्यापासून ते जैतापूर, नाटे पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने हा रस्त्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याची दुरावस्था झालेली असताना दुरूस्तीकडे मात्र कोणीच लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राजापूर हातिवले मार्गे जैतापूर हा मार्ग जैतापूर नाटे या पुलामुळे रत्नागिरीत जाण्यासाठी सुलभ व कमी वेळेचा मार्ग ठरत असल्याने यामार्गे नियमित वाहतूक चालू असते. शिवाय देवगड सिंधुदुर्ग यामध्ये जाणाऱ्या वाहनांची सुद्धा जैतापूर मार्गावरून वाहतूक असते. मात्र जैतापूर येथील रस्ता ठीक ठिकाणी खड्डेमय झाला असून या खड्ड्यांमुळे वाहतुकीला त्रास होत आहे. असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवताना दिसत नसून या खड्डेयुक्त रस्त्यांमधून प्रवास करताना ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
अगदी डोंगर तिठा, जैतापूर, नाटे अशा संपूर्ण रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने जनता त्रस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांचे तात्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. जैतापूर नाटे या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे शिवाय मच्छिमार बांधव आहेत. त्यांची सातत्याने या रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. त्यामुळे याची दखल घेऊन तातडीने डांबरीकरण अथवा खड्डे बुजविण्याचे काम करावे, अशी मागणी परिसरातील जनतेतून करण्यात येत आहे.