तालुकाध्यक्षांना अंधारात ठेवून आयोजित केलेली बैठक गाजली : तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी सुनावले खडे बोल
प्रतिनिधी / रत्नागिरी
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या रत्नागिरी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत अंतर्गत वादाचे पडसाद उमटले. जिल्हाध्यक्ष विरोधी गटातील सर्वांनी तालुकाध्यक्षांना अंधारात ठेवून घेतलेल्या परस्पर निर्णयाला जोरदार विरोध केल्यामुळे तालुका कॉंग्रेसची बैठक चांगलीच गाजली. त्यानंतर बैठकीत आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.
संघटनेच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षांना अंधारात ठेवून मिडिया सेल प्रमुख कपिल नागवेकर यांनी परस्पर सभा बोलावण्यात आली होती. त्यामुळे तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी शनिवारी झालेल्या काँग्रेसभवन येथील सभेत याचा जाब विचारला. केंद्र सरकारने घोषित केलेल्या शेतकरीविरोधी कायदाबद्दल रत्नागिरी तालुका काँग्रेस निरीक्षक व आंबा व्यावसायिक बरकतभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी मला माहित नसताना बैठक परस्पर कशी लावली, असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीवरून उपळेकर यांनी तालुकाध्यक्षांना अंधारात ठेवून परस्पर बैठका आयोजित करणे, ही हुकुमशाही आहे. ही बाब कदापीही खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी या सभेत ठणकावून सांगितले. याला तालुक्यातील काही पदाधिकाऱयांसह जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱयांनीही प्रसाद उपळेकर यांना समर्थन दिले. त्यामुळे केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेली बैठक चांगलीच गाजली. त्यांनतर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रसाद उपळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्यांची मोहीम राबवण्यासाठी काँग्रेसभवन येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निश्चित केली. त्यावेळी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर, जिल्हा सरचिटणीस व उद्योजक अशपाकभाई काद्री, ज्येष्ठ नेते व उद्योजक नाथाशेठ आडाव, रत्नागिरी तालुका अध्यक्ष (ओ.बी.सी.) प्रितम पिलणकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष हारिस शेकासन, (सेवादल) तालुका अध्यक्ष भाग्येश मयेकर, कपिल नागवेकर, दीपक राऊत, सी. ए. जाधव, इम्तियाज मुजावर, दिगंबर किर, श्रीपाद उपळेकर, शब्बीर भाटकर, बंडू सावंत इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.