प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग चक्रीवादळाचा तडाख्याने रत्नागिरी तालुक्यात चांगलीच दाणदाण उडवून दिली. वादळाच्या प्रचंड वेगामुळे मोठय़ा प्रमाणात झाडे उन्मलून पडली. त्यात घरांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक घरांची छप्परेही उडाली. मोडलेल्या झाडांमुळे अनेक ठिकाणी रस्तेही काही तास बंद झाले होते. समुद्रकिनारी भागात तर उधाणलेल्या समुद्राचे तांडव नागरिकांनी अनुभवले.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनस्तरावर गेल्या दोन दिवसांपासून सर्वांनाच सतर्कतेचा इशारा दिला होता. बुधवारी हो वादळ किनारी भागात धडकणार असल्याने संचारबंदीही लागू करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना यादिवशी सकाळपासूनच घराबाहेर पडणे टाळले होते. बुधवारी अगदी दिवसभर सर्व रस्तेही सुनसान झालेले होते. पहाटेपासून वादळाच्या वाढलेल्या वेगाने सकाळी अधिक जोर धरला. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीने काहुर माजला होता. वादळाबरोबर मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्यात अगदी दुपारपर्यंत हाहाकार माजवला.
प्रचंड वेगाने घोंघावलेल्या या वादळाने मोठय़ा प्रमाणात हानीला सामोरे जावे लागले आहे. या वादळाचा रत्नागिरी तालुक्यातील गावागावांमध्ये अनेक इमारती, दुकाने, वाहने, नागरिक आदी मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात या वादळाचा वेग प्रचंड होता. त्यामुळे या भागात मोठी हानी झाल्याचे सांगण्यात येते. रत्नागिरी शहरातील सर्व भागात शुकशुकाट पसरलेला होता. रत्नागिरी तालुक्यात बाग-बागायतींचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. वेगवान वारा आणि पावसाने अक्षरक्षः झोडून काढले. रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी होर्डीग्जही वाऱयामुळे रस्त्यावर कोसळून पडली होती.
येथील भगवती बंदर येथील नर्मदा जेटीजवळ नागंरून ठेवलेली भलीमोठी बोटीचा नांगर उधाणलेल्या समुद्राच्या रौद्ररुपाने तुटला. त्यामुळे भरकटलेली ती बोट मिऱया किनारी पंधरामाड येथील धुपप्रतिबंधक बंधाऱयालगत येऊन वाळूत रुतून बसली. शहरातील घाणेकरआळी येथील एका घरावर झाड पडून मोठे नुकसान झाल्याचीही घटना घडली.
तालुक्यातील भोके गावातील मायंगडेवाडी मध्ये बाळकृष्ण मायंगडे यांच्या मालकीचे किराणा दुकान व चिकन सेंन्टर चे वादळी वाऱयाने मोठे नुकसान झाले आहे. तसेच येथील ओरपे यांच्या दुकानाचेही मोठे नुकसान झालेले आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी येथील सरपंच श्रीपद मायंगडे, ग्रामसेवक सरस्वती मोरे, तलाठी विजय राठोड, रुपेश रेवाळे, अनिले रेवाळे आदींच्या उपस्थितीत करण्यात येऊन पंचनामे करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील वेगवान वादळाच्या तडाख्याने मिरजोळे परिसरातही नुकसान झाले आहे. येथील जांभूळफाटा येथे नाखरेकर सर यांच्या घराजवळ मजगाव मार्गांवर भलेमोठे झाड कोसळून हा मार्ग काहीकाळ बंद झाला होता. एमआयडीसी परिसरात एसटीवर्क शॉपची चिरेबंदी तटबंदी झालेल्या पावसाने कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले.
प्रसिध्द श्री गणपतीपुळे मंदिर परिसरातही या वादळाचा मोठा तडाखा बसला. मंदिरासमोरील उभारण्यात आलेली शेडचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. येथील स्वागत कमान तसेच आजूबाजूच्या परिसरातही झाडांची मोडतोड झाली. मालगुंड कवी केशवसूत स्मारक परिसरातही मोठ मोठी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. त्याचबरोबर फणसोप, रीळ उंडी, नांदीवडे गावातील काही घरांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर नाणीज येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मात्र ताबडतोब झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिह्यातील गणेशगुळे कुर्धे येथील शिंदे वाडीतील ग्रामस्थ विकास शिंदे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. बाजूला उभ्या असलेल्या सुरेश शिंदे यांच्या रिक्षा वर ही झाड कोसळल्याने रिक्षा चे नुकसान झाले. करबुडे बौद्धवाडी येथे रस्त्यात झाड कोसळल.s त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सुरेश सावंत यांचा वाडा पडला कोणतीही हानी नाही. नाणीज जवळील नविन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष आज सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाणीज येथील तलाठी मिस्त्राr त्वरीत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पडलेल्या वृक्ष बाजूला करण्यात आला. तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता. या झालेल्या नुकसानीनंतर प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर पंचनामे करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली.