वीज बिल कमी करण्याबाबत राजकीय पक्षांनी दिली होती निवेदने
अद्याप कार्यवाही शून्य
वार्ताहर / मौजेदापोली
दापोलीत राजकिय पुढाऱयांनी महावितरणकडे व मुख्यमंत्र्यांकडे वीज बिले कमी करण्याची मागणी करून देखील अद्याप या निवेदनांवर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे. यामुळे वीज ग्राहक सर्वच राजकीय पक्षांवर नाराज आहेत.
राज्यात कोरोनाचे संकट त्यानंतर दापोली, मंडणगड, खेड आदी ठिकाणी निसर्ग चक्रीवादळ यामुळे नागरीक संकटात सापडलेल्या आहेत. त्यात अनेक नागरीकांची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक आहे. असे असताना राज्य महावितरण कंपनीकडून भरमसाठ रक्कमेची वीज बिले काढण्यात आली. त्यामुळे ही वीज बिले भरायची कशी या विचारात नागरिक असताना दापोलीतील अनेक पक्षांच्या पुढार्यांनी महावितरणला निवेदने देवून ही वीज बिले कमी करण्याची मागणी केली होती. परंतु राज्य शासन व महावितरण कंपनीकडून अद्याप कोणत्याही प्रकारे वीज बिले कमी करण्यात आलेली नाहीत. सर्व निवेदने वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात आलेली आहे. महावितरण कंपनी हा निर्णय घेत नसून मंत्रालयातून याची कार्यवाही होते. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच वीज बिले कमी होवू शकता असे दापोली महावितरणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाचा अर्थात उर्जामंत्र्यांचा वीज बिले कमी करण्याचा निर्णय होईल पर्यंत नागरीकांवर वीज बिलांचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे.
दापोलीतील जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत आंदोलने केली होती. मात्र, तरी देखील प्रशासनाने कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाची दखल घेतलेली दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल कमालीचे नाराजीचे वातावरण आहे.