रत्नागिरीचे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी
कोरोनाची तमा न राखता लोक पडताहेत घराबाहेर
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीत दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन उठताच सोमवारी येथील रस्ते वाहनांच्या गर्दीने ओसंडून गेल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळून जरी इतर दुकाने बंद असली तरीही नागरिक आवश्यक खरेदीसाठी व कामांसाठी वाढत्या कोरोना फैलावाची जराही तमा न बाळगता घराबाहेर पडताना दिसत आहेत.
कोरोनाचा अतिवेगाने फैलाव होऊ लागलेला आहे. या प्रसाराच्या पार्श्वभुमीवर शासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नव्या नियमावलीनुसार जमावबंदी आदेश जारी केलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत. शुकवारी रात्रीपासून सर्वत्र कडक विकेंड लॉकडाऊनचा प्रारंभ झाला. तो अगदी सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदीत हा लॉकडाऊन होता. रत्नागिरीत हा विकेंड लॉकडाऊन नागरिकांनी अगदी उत्स्फूर्त पाळल्याचे दिसून आले. दोन दिवस लोकांनी संचारबंदीचे फारसे उल्लंघन न करता घरात राहणे पसंत केलेले होते.