प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील करमरकर हॉस्पिटल बाहेरील दुकान खोक्यांच्या चबुतऱयांसाठी लिलाव प्रक्रिया राबवण्याचे रत्नागिरी नगर परिषदेने प्रस्तावित केले आहे. त्याचवेळी शिवाजी स्टेडियममधील दुकानगाळे ताब्यात घेण्यासाठी मात्र कोरोना विलंबाचे कारण देण्यात येत आहे. नगर परिषदेच्या या वेगवेगळ्या भुमिकांमुळे नागरिकांत चर्चा सुरु झाली आहे.
रत्नागिरी शहरातील मारुतीमंदिर परिसरात गजबजलेल्या ठिकाणी, करमरकर हॉस्पिटल बाहेर नगर परिषदेने भाडे तत्वावर चबुतरे †िदले आहेत. त्यांची मुदत संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया सुरु करावी असे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. यापूर्वीचे चबुतरेधारक अद्यापही त्या जागेवर कायम आहेत.त्यांनी चबुतऱयाचा ताबा नगर परिषदेकडे दिलेला नाही.
दुसऱया बाजूला छत्रपती शिवाजी स्टेडिअममधील 11 गाळ्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. या निविदा प्रक्रियेमध्ये अनेक लोकांनी बोली लावल्या. अंतिम बोलीला मंजुरी देण्यात आली. तथापि नव्या बोली धारकांना गाळ्यांचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही. कोरोना लॉकडाऊनचे कारण त्यासाठी सांगण्यात येत आहे.
करमरकर हॉस्पिटलबाहेरील चबुतऱयांसाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्याची घाई नगर परिषदेला दिसून येत आहे. 16 जुलै रोजी होणाऱया सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी शिवाजी स्टेडिअममधील गाळ्यांच्या बाबतीत मात्र वेगळी प्रक्रिया सुरु राहिली आहे.
चबुतऱयांसाठी लिलाव प्रक्रिया राबवणार
करमरकर हॉस्पिटलबाहेरील चबुतऱयांसाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात येईल. अद्याप ताबा न दिलेले चबुतराधारक लिलावात भाग घेऊ शकतील. टाऊनप्लॅनिंगने ठरवून दिलेल्या रकमेवर लिलाव बोली होईल. स्टेडिअममधील गाळेधारकांना करार करून ताबा देऊ. लॉकडाऊननंतर ते करण्यात येईल. 16 जुलैची सर्वसाधारण सभा सोशल डिस्टन्सिंग पाळून घेण्यात येईल. त्यावेळी चबुतऱयांविषयी निर्णय घेण्यात येईल.
-प्रदीप ऊर्फ बंडय़ा साळवी
नगराध्यक्ष, नगर परिषद,