प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात ‘माझी वसुंधरा’ अभियानास 2 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. येत्या 31 मार्च 2021 या कालावधीत हे अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्याचा निर्णय शासनाकडून झालेला आहे. त्यानुसार रत्नागिरी नगर परिषदेतही अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. शहरात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नगर परिषद आवारात ‘चार्जिंग पॉईंट’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या चार्जिंग पॉईंट च्या वीजबिलापोटी नगर परिषदेला दर महिन्यास 2 हजार रु. इतका खर्च अपेक्षित आहे. सुरूवातीच्या कालावधीत ही सुविधा सुरू करताना निःशुल्क चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेण्यात आला आहे.
‘माझी वसुंधरा’ या अभियानांतर्गंत चार्जिंग पॉईंटचे जाळे उभे करण्यासाठी नवीन धोरणानुसार कोणीही चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. यामुळे उत्पन्नाचा नवा स्त्राsतही मिळणार आहे. देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखले आहे. सध्या देशात एका चार्जिंमध्ये कमी अंतर कापणाऱया कार आणि वीजेच्या उपलब्धतेची वानवा यामुळे सध्यातरी वाहनचालक डिझेल, पेट्रोलच्या कारना पसंती देत आहेत. मात्र, विजेवर चालणाऱया गाडय़ा प्रदुषण कमी करणार असल्याने सरकार याकडे गांभिर्याने पाहत आहे. निसर्गाच्या पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही. जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही, म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबण्यासाठी “माझी वसुंधरा’ हे अभियान राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा’’ अभियान हे राज्यातील 667 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यास शासन मान्यता यापूर्वीच दिलेली आहे.