सांगली : प्रतिनिधी
मिरज तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील धामणी, अंकली, निलजी आणि बामणी या गावांतील ग्रामस्थांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या कामामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच या कामासंदर्भात काही समज गैरसमज झालेने खासदार संजयकाका पाटील यांचे सुचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदर गावांतील लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी येणाऱ्या सर्व अडीअडचणी सांगितल्या असता त्या लवकरात लवकर सोडविण्याबाबत विलंब न करता कारवाई करणेबाबत खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
यावेळी खासदार पाटील, जिल्हाधिकारी चौधरी यांनी बैठकीसोबतच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला. बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंढारकर, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, प्रांताधिकारी समीर शिंगटे तसेच जलसंपदा विभाग व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि अंकली, धामणी, निलजी व बामणी येथील लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.