कोरोनामुळे 31 मार्चपर्यंत सभांना स्थगिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. हद्दवाढीसाठी शहरालगतच्या 15 ग्रामपंचायतींमधील 29 महसूली गावांच्या समावेशाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींचे ठराव आवश्यक आहेत. त्यासाठी ग्रामसभा आवश्यक आहेत. मात्र शासनाच्या सूचनांप्रमाणे 31 मार्चपर्यंत त्या होऊ शकणार नसल्याने ही कार्यवाही पुढे सरकण्यासाठी आणखी किमान दीड महिना वाट पहावी लागणार आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा मिळावा म्हणून शहरालगतच्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नाहकरत मिळवली जाणार आहे. अनेक वर्षांपासून नगर परिषद हद्दवाढीच्या रखडलेल्या प्रस्तावाला गती देण्यासाठी कार्यवाही सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. नगर परिषद हद्दीला लागून असलेल्या 15 किमी परिघातील 15 ग्रामपंचायतींचा पालिकेत समावेश होणे प्रस्तावित आहे. त्याद्वारे नगर परिषद ‘क’ दर्जांची महापालिका बनवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी चर्चा करून ग्रामपंचायतींनी विश्वासात घेत ना हरकत प्राप्त करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. शहरात येण्यास इच्छुक असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव पाठवावा, असे पत्र 15 संबंधित ग्रामपंचायतींना पाठवण्यात आले आहे. त्याची प्रत जिल्हा परिषद ग्रामविकास विभागालाही पाठवण्यात आली आहे. मात्र शासनाने 31 मार्चपर्यंत ग्रामसभा घेण्यास स्थगिती दिली आहे. त्यातच काही ग्रामपंचायतींची सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रिया नुकतीच पार पडत असल्याने धोरण ठरवण्यासाठी काही कालावधी जाणार हे निश्चित आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असतानाच जिल्हा प्रशासनाकडून हद्दवाढीच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात सहभागी होण्याचा ठराव आल्यानंतरच पुढील प्रक्रिया प्रशासनाकडून सुरु होणार आहे. त्या ग्रामपंचायतींत सडामिऱया, मिऱया, शिरगाव, मिरजोळे, खेडशी, हातखंबा, झरेवारी, पानवल, पोमेंडी (बुद्रुक), पोमेंडी खुर्द, कुवारबाव, नाचणे, कर्ला, भाटय़े, फणसोप यांचा समावेश आहे. ठराव करण्यासाठीचा कालावधी निश्चित नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.