प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील पन्हले येथील २०वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या लघू धरणाला गत महिन्यात गळती सुरू झाली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पाटबंधारे विभागाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पाहणी करून पाटबंधारे कार्यकारी अधिकारी अभियंता यानी या धरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. मात्र धरणाची गळती थांबली असली तरी धरणाला भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याने धरणाचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी पन्हळे ग्रामस्थांच्यावतीने केली जात आहे.
पन्हळे धरणाची पाहणी करून पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी पडत असलेली भेगा निदर्शनाश आणून दिल्या आहेत. पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असतानाच धरणाच्या इतर भागाला भेगा पडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करत आहेत. गत महिन्यामध्ये परतीच्या पावसामध्ये धरणाच्या मध्यभागी रात्रीच्यावेळी धरणाच्या खालील भागातून गढूळ पाणी गळती झाली होती. धरणातुन गढूळ पाणी सुरू झाल्याचे जोशी गुरव वाडीतील ग्रामस्थांना समजले त्यानंतर सरपंच मसणे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना याची माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, शाखा अभियंता संजय नलावडे हे घटनास्थळी दाखल झाले.
या धरणातून गढूळ पाणी प्रवाह सुरू होता. पाटबंधारे विभागाचे तंत्रज्ञ यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. धरणात 3.44 द.घ., ल मीटर पाणी साठा पावसाने झाला होता. तालुक्यात अवकाळी आणि मुसळ धार पावसाने सर्वच धरणांतील पाणी साठा वाढल्याने पाणी दाबामुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी पाणीसाठा विसर्ग केला होता. कार्यकारी अभियंता यांनी सांगितले होते की’ या धरणाला गेली पाच वर्ष कमी लिकेज आहेत. मात्र दुरुस्ती होत असते. झालेली गळती ही धोक्याची नसून दुरुस्थिचा हा भाग असल्याचे सांगितले होते. या धरणाच्या डागडुजी साठी रुपये १ कोटी रुपयाचे अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले आहे. मात्र काम केंव्हा सुरू होणार याकडे पन्हळेवाशीयांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, धरणाला पावसाळ्यात पडलेल्या भेगांचा आकार वाढत असून धरणाच्या अन्य भागातही तडा गेल्या आहेत. धरणाला गेलेल्या भेगांमुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आले आहेत. धरणाची ग्रामस्थांनी पाहणी केली असून धरणाला जाणाऱ्या भेगांमुळे चिंता व्यक्त केली आहे. पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी व ग्रामस्थांनी धरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली आहे.