व्यापाऱयांच्या बैठकीत ‘जनता कर्फ्यु’ला विरोध
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी जिह्यात तब्बल नवे 207 रुग्ण सापडले. या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित व्यापाऱयांच्या बैठकीत व्यापाऱयांनी रत्नागिरी बाजारपेठ बंद ठेवण्याला कडाडून विरोध करून आधीच व्यापार तोटय़ात असून ज्या कुणाला स्वेच्छेने दुकान बंद ठेवायचे आहे. त्याने ते ठेवावे. आम्ही ठेवणार नाही, असे रोखठोक मत मांडले. त्यामुळे बाजारपेठेतील जनता कर्फ्यु संकल्पनेला तूर्तास पूर्णविराम मिळाला असून आवश्यक खबरदारी घेत बाजारपेठ सुरू राहणार आहे.
रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापारी व कर्मचाऱयांसाठी सलग 3 दिवस ऍन्टीजेन चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या तपासणीत 168 जणांपैकी 29 जण बाधीत आढळले. बाजारपेठेतील व्यापारी व कर्मचाऱयांमध्ये 20-25 टक्के लोकांमध्ये कोरोना बाधा असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत खबरदारी म्हणून रत्नागिरी बाजारपेठेतही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी ‘जनता कर्फ्यु’ची संकल्पना मांडली व त्या संदर्भात व्यापाऱयांची मते जाणून घेण्यासाठी रविवारी शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात व्यापाऱयांची बैठक आयोजित केली. या बैठकीत दुकाने बंद ठेवण्याच्या संकल्पनेला व्यापाऱयांनी कडाडून विरोध केला.
मागील लॉकडाऊनमुळे आधीच व्यापार तोटय़ात असून आता बंद ठेवणे झेपणार नसल्याचे मत यावेळी अनेक व्यापाऱयांनी व्यक्त केले. ज्या कुणाला स्वेच्छेने दुकान बंद ठेवायचे आहे. त्याने ते ठेवावे. आम्ही ठेवणार नाही, असे रोखठोक मत व्यापाऱयांनी या सभेत नोंदवले. त्यामुळे आता रत्नागिरी शहराच्या तथाकथित जनता कर्फ्यु संकल्पनेला तूर्तास पूर्णविराम मिळाला असून आवश्यक खबरदारी घेत बाजारपेठ सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना नव्याने लॉकडाऊन करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यावर उपाय म्हणून ठराविक परिसर जनता कर्फ्यू जाहीर करून व्यापारी व अन्य सार्वजनिक व्यवहार बंद करण्यात येत आहेत. रत्नागिरीतही वाढत जाणाऱया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता असताना व्यापाऱयांनी जनता कर्फ्युला विरोध दर्शवल्याने आता व्यापाऱयांच्या बैठकीतील निर्णयाबाबत होणाऱया चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.