प्रतिनिधी / खेड
रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने अपघात सुरक्षा योजनेतंर्गत ३० लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा शिक्षक भारतीने केलेल्या मागणीला अखेर यश आले असून बँकेचे खातेदार असलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शिक्षक भारतीने केलेल्या पाठपुराव्याबद्दल सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील व पदाधिकाऱ्यांनी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांची भेट घेत बँकेने कर्मचारी खातेदारांना अपघात सुरक्षा विमा योजनेचे कवच देवून त्यासाठी ५० लाख रूपयांचा विमा निर्धारित करण्याची आग्रही मागणी केली होती. अपघात सुरक्षा विमा योजनेबाबत बँकेकडून निश्चितच प्राधान्य देवून विचारविनियम करण्याचे आश्वासन देत याबाबतचा निर्णय लवकरच घेण्याची हमी देखील दिली होती.
त्यानुसार बँकेने खातेदार असलेल्या शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यासाठी ३० लाख रूपयांचा अपघात सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याची निश्चित केले आहे. यासाठी लागणारी हप्त्याची रक्कम बँकेमार्फत भरण्यात येईल. अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिल्याचे शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी सांगितले. या निर्णयाबद्दल माध्यमिक शाळा कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.