वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यात रविवारपासून मुसळधारेने कोसळणाऱया पावसामुळे सोमवारी अर्जुना व कोदवली नदीच्या पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवाहर चौकातील टिळेकर फोटो स्टुडीओपर्यंत पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ रस्ता, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद होती.
मान्सूनच्या सुरूवातीला दरमदार हजेरी लावल्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी दिवसभर सततधारेने कोसळणाऱया पावसामुळे सायंकाळी कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील टपऱयांपर्यंत आले होते. त्यातच रात्री पावसाचा जोर वाढल्याने पूराच्या पाण्यात वाढ होत होती. मध्यरात्री पूराचे पाणी जवाहर चौकात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पुराच्या पाण्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मजल मारली. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱयांसह नागरीकांची चांगलीच धावपळ उडाली.
शिवजीपथ, बंदरधक्का, चिंचबांध, वरचीपेठ, गुजराळी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वरचीपेठ रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने शिळ, दोनिवडे, गोठणे दोनिवडे हा मार्ग बंद झाला आहे. शिवाय नदीकीनाऱयालतची भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकात आल्याने जवाहर चौकात येणाऱया एसटी फेऱ्या डेपोतूनच सोडण्यात आल्या.
पुराच्या शक्यतेने नदीकिनाऱयालगतच्या व्यापाऱयांनी रात्रीच दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलविले तर सकाळपासून वाढलेला पावसाचा जोर आणि वाढणाऱया पाण्याचा अंदाज घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱयांनीही आपले सामान सुरक्षित स्थळी हलविल्याने कोणाचे नुकसान झाले नाही. जवाहर चौक पाण्याखाली गेल्याने बाजारपेठेते येणाऱया नागरीकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेची आपत्कालीन बोट तैनात ठेवण्यात आली होती. नगराध्यक्ष अŸड.जमीर खलिफे यांनी पुरस्थितीची पाहणी केली.
दरम्यान ग्रामीण भागातही पावसाचा जोर असून पिंदावण बांदीवडे गावातून गेलेल्या सुखनदीचे पाणी पिंदावण, बांदीवडे, तळेखाजन आदी परिसरातील भातशेतीमध्ये शिरले आहे. तर राजापूर ओणी, पाचल मार्गावर सौंदळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
दोन दिवस कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे राजापूर तालुका व शहर परिसरात पुरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी सकाळी 7.30च्या दरम्याने कोंढेतड पुलाजवळून एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तशी माहिती राजापूर तहसीलदार पतिभा वराळे यांनी दिली. वाहून गेलेल्या इसमाचा शोध सुरू आहे.