वार्ताहर / मौजेदापोली
पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असून तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नियम कडक करण्यात आले असताना देखील दापोली समुद्रकिनाऱ्या लगत असलेल्या काही हॉटेलमध्ये पर्यटक गुपचूप येत असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच नाक्या नाक्यावर पोलीस पहारा देत आहेत. असे असताना देखील दापोलीतील काही प्रसिद्ध किनाऱ्यांवर पर्यटक चारचाकी व दुचाकी घेवून येत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. तसेच अनेक जण समुद्रकिनाऱ्यांवर उगाच टाईपास करण्यासाठी रात्री दिवसा भटकत असल्याचे समोर बोलले जात आहे. मात्र अशांवर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे देखील बोलले जात आहे.
ग्रामीण भागांमध्ये अधिक कोविडचे रूग्ण सापडत आहेत. अशा गावांमध्ये ग्रामस्थ एकत्रित येत आहेत. सभा, बैठका पार पडत असल्याचे चित्र आहे. मात्र स्थानिक प्रशासन डोळे झाक करत आहेत. गावात येणारे पर्यटक कुठल्या हॉटेलमध्ये रहात आहेत, गावात येण्यास प्रवेश कसा मिळाला याची साधी चौकशी देखील केली जात नाही. पोलिसांच्या हातावर तुरी देवून हे महाशय दुचाकी, चार चाकी काहीना काही कारणे सांगून सरळ पर्यटन क्षेत्राकडे येत असल्याचे जोरदार चर्चा समुद्रालगत अर्थात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गावांमध्ये आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन, पोलीस, तालुका प्रशासन काय कार्यवाही करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहीलेले आहे.