निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्रीचा संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा
प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागातील सागरी सुरक्षा वाळूमाफियांमुळे धोक्यात आली असून रात्रीच्या दरम्याने मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतुक केली जात असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूका असल्याने खाडीभागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. खाडीभागातील डिंगणी, मांजरे, कोंडे, डावखोल आदी ग्रामपंचायत निवडणुका आहेत. निवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच रात्रीच्या दरम्याने खाडीभागातील याच गावातून संक्शन पंपाद्वारे वाळू उपसा केला जात असल्याची चर्चा आहे.
उपसलेली वाळू साठवण करून ती रात्रीच्या दरम्यान कोल्हापूर किंवा इतर बाहेर गावातून पाठवली जात आहे. त्यामुळे खाडीभागात रात्रीच्या दरम्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत. निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच वाळूमाफियामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी करजुवे येथे दोन गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती. याही भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे .त्यामुळे वातावरण आणखीन बिघडण्याची शक्यता आहे.
खाडीभागाची सुरक्षा राम भरोसे
काही वर्षांपूर्वी खाडीभागातील मांजरे ( भातगाव) याठिकाणी एके 56 रायफल सापडली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. खाडीभाग समुद्राच्या जवळ येत असल्याने याठिकाणी नेहमी सतर्क राहावे लागते मात्र रात्रीच्या दरम्यान होणारा वाळू उपसा त्रासदायक ठरनारा असून त्यावर महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.