प्रतिनिधी/रत्नागिरी
गेल्या 4-5 महिन्यांपासून एस.टी.समोर टायर पुरवठय़ाची नवीन समस्या उभी राहिली आहे. टायर पुरवठा होत नसल्याने एस.टी बंद ठेवण्याची वेळ विभागावर आली आहे. रत्नागिरी विभागाने 600 टायरची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 240 टायर रत्नागिरी कार्यशाळेत दाखल झाल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
रत्नागिरी विभागाने सुरूवातीला लगतच्या जिल्हय़ातून टायर घेतले, मात्र आता इतर जिल्हय़ातही टायर नसल्याने रत्नागिरी एस.टी अडचणीत सापडली आहे. तब्बल 200 गाडय़ा डेपोत लावून ठेवण्याची वेळ पहिल्यांदाच विभागावर आली आहे. मात्र आता 240 टायर उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात गाडय़ा सुरू होतील, असा विश्वास रत्नागिरी विभागाने व्यक्त केला आहे. टायर नसल्याने एस.टी.चे शेडय़ुल कमी करण्याची वेळ आली असून पूर्वी 758 शेडय़ुल होत्या. आता 578 च शेडय़ुल आहेत. याचा चांगला फटका बसत असून आठवडाभरात टायर उपलब्ध न झाल्यास आणखीन बसेस बंद ठेवण्याची वेळ रत्नागिरीवर येणार होती, मात्र सोमवारी 240 टायर आल्याने ही वेळ आली नाही. महामंडळाला जे.के आणि एमआरएफ कंपनीकडून टायर पुरवठा केला जातो. या दोन्ही कंपन्यांना महामंडळाने पैसे न दिल्याने त्यांनी संपूर्ण राज्यात पुरवठा थांबवला आहे, मात्र नुकतेच जेके कंपनीला 2 कोटी 30 लाख महामंडळाला दिले आहे. टप्याटप्याने टायर पुरवठा केला जाईल, अशी माहिती महामंडळाने प्रत्येक डेपोला दिली आहे.