वनविभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहनाची भर
प्रतिनिधी/ चिपळूण
वनविभागाच्या खारफुटी व सागरी जैवविविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या माध्यमातून रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्यप्राण्यांच्या बचावासाठी रूग्णवाहिका पुरवण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयात या रूग्णवाहिका दाखल झाल्याने वनविभागाच्या सध्याच्या ताफ्यात आणखी एका अत्याधुनिक वाहनाची भर पडली आहे.
निसर्गसंपन्नतेने समृध्द असलेल्या कोकणात हिंस्त्र व इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे जखमी, संकटात सापडलेल्या अथवा लोकवस्तीत शिरलेल्या वन्यप्राण्यांचा बचाव करुन सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त करण्याचे काम सध्या खासगी वाहनाने केले जाते. मात्र खासगी वाहनाची रचना आणि त्यामध्ये पिंजरा ठेवताना फार यातायात करावी लागली. त्यामुळे त्यामुळे अशा परिस्थितीत वन्यजीव रूग्णवाहिकेचा उपयोग होणारा आहे. वनविभागाच्या खारफुटी व सागरी जैवविविधता प्रतिष्ठानच्या सहकार्याने बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून सागरी जिल्हय़ांसाठी प्रत्येकी एक वन्यजीव रूग्णवाहिका पुरवण्यात आली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे.
येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयात चार दिवसांपूर्वीच या रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. या रूग्णवाहिकेत मगर तसेच बिबटय़ाचा पिंजरा बसेल, अशी तिची अंतर्गत रचना तयार करण्यात आली आहे. डोंगरातील कच्चा रस्ता आणि अगदी खाच-खळग्यातूनही ती प्रवास करेल, अशी तिची बांधणी करण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेमुळे कोकणातील वनविभागाच्या ताफ्यामध्ये आणखी एका अत्याधुनिक वाहनाची भर पडली आहे. रूग्णवाहिका हस्तांतरप्रसंगी जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, क्षेत्रीय तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.