रत्नागिरी : प्रतिनिधी
गेले दोन वर्ष कोरोनामुळे सर्वच उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख ऊरुसाला प्रशासनाने ५० लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. या बाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आला असून त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.
हातीस येथील पीर बाबर शेख या ऊरुस येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी होत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत ऊरुस साजरा करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या ऊरुसादरम्यान अन्य नागरिकांना हातीस याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून या दोन दिवशी हातीस परिसरात नाकाबंदी व चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. दरवर्षी हातीस येथील पीर बाबर शेख ऊरुसाला लाखो भाविक येतात. पण गेली दोन वर्ष हा ऊरुस न झाल्याने नागरिक नाराज होते. पण यंदाही ५० लोकांच्या उपस्थित हा ऊरुस साजरा होणार आहे.