ग्लोबल कोकणच्या माध्यमातून पहिल्यांदाच पंचतारांकित हॉटेलमध्ये लिलाव,
राजेश अथांयडे यांची शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारी बोली
वार्ताहर / राजापूर, रत्नागिरी
कोकणातील आंबा बागातदारांच्या बागेत पिकलेल्या हापूस आंब्याचा पहिला खुला लिलाव मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी पार पडला. यामध्ये आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या पेटीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभताना तब्बल 1 लाख 8 हजार रूपये भाव मिळाला.
कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याची जगभरातील ग्राहकांना थेट विक्री करणाऱ्या `मायको’ या मँगो टेक प्लॅटफॉर्मचा शुभारंभ नुकताच माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते दिल्ली येथे पार पडला. त्यानंतर या डिजिटल स्टार्टअपद्वारे कोकणातील आंबा बागातदारांच्या बागेत पिकलेल्या आंबा पेट्यांचा लिलाव शुक्रवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. उद्योजक आणि सेंट एंजेलो कॉम्प्युटर इन्स्टिट्युटचे मालक राजेश अथांयडे यांनी शेतकऱ्यांचा उत्साह वाढवणारी सर्वाधिक बोली लावली. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 25 हजार रूपये किंमतीच्या चार पेट्यांची खरेदी या लिलावात केली.
आजही अनेक ठिकाणी रूमालाखाली हात टाकून हापूसचा लिलाव होतो. त्याचे परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम सर्वांनाच माहित आहे. मात्र ग्लोबल कोकणने हापूस आंब्याचा पहिला खुला लिलाव पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केला व यातून जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना समप्रमाणात वाटून देण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, निर्यातदार दीपक परब, बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ मोरे, गणेश यादव, उद्योजक रमेशभाई मदत, क्रिकेट कोच नीलेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि उद्योजकांनी या कोकण विकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेतला.
कोकणातील परिश्रमी 100 शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी `ग्लोबल कोकण’ व `कोकण भूमी प्रतिष्ठान’द्वारे पुढाकार घेत शेतकऱ्यांचा देशातील पहिला डिजिटल स्टार्टअप बनवण्यात आला आहे. हा हायटेक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि हापूस आंब्याचा ब्रँड राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे व सुनयना रावराणे यांनी ग्लोबल कोकणच्या माध्यमातून सुरू केला आहे. यावेळी बाबू अवसरे, यशवंत कोयंडे, पंढरीनाथ आंबेरकर व अन्य आंबा बागायतदार, शेतकरी खास कोकणातून सहभागी झाले होते.
प्रचंड परिश्रमाने कोकणातील हापूस आंब्यांची लागवड केली जाते. पण जेव्हा या आंब्यांच्या पेटीचा लिलाव करण्यात येतो, त्यावेळी शेतकऱ्यांना योग्य तो भाव न मिळाल्याने त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकऱयाला प्रतिष्ठा देणारा व त्यांच्या परिश्रमांचा सन्मान करणारा `मायको’ हा विशेष उपक्रम आहे. या माध्यमातून विजयदुर्ग, राजापूर, देवगड, रत्नागिरी आणि कोकणच्या इतर भागातील सर्वोत्कृष्ट दर्जाचा आणि कोणतीही भेसळ नसलेला आंबा जगभरातील ग्राहकांना मिळणार आहे, असे ‘ग्लोबल कोकण’चे संचालक संजय यादवराव म्हणाले. विशेष ‘मॅंगो ट्रव्हल फेस्ट’चे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. या फेस्टच्या माध्यमातून पर्यटकांना खरा हापूस आंबा कसा पिकतो, त्याच्या लागवडीसाठी कशी मेहनत केली जाते, याचा प्रत्यक्ष शेतात अनुभव घेता येईल. आंब्याचा आस्वाद घेण्यापासून ते तोडण्यापर्यंतचा आनंद या फेस्टच्या माध्यमातून प्रत्येकाला घेता येईल. या फेस्टचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते 10 मार्च रोजी होणार असल्याचे ते पुढे म्हणाले.