ठेकेदाराने पेमेंट न झाल्याने काम थांबवले
परिवहनमंत्र्यांनी पश्न मार्गी लावण्याची मागणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी एस.टी बसस्थानक हायटेक करणार म्हणून गेल्या पाच-सहा वर्षापासून घोषणा केल्या जात आहेत. मात्र, गेले वर्षभर या हायटेक बसस्थानकाचे काम ठेकेदाराने पेमेंट न मिळाल्याने थांबवले आहे. 10 कोटीचा हा प्रस्ताव संबंधित ठेकेदाराला पेमेंट न झाल्याने त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी लक्ष घालून त्वरीत प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता रत्नागिरीकरांकडून होवू लागली आहे.
गेल्या सहा वर्षापासून रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचा विषय सुरू आहे. सत्ता बदलली की, प्रस्तावही बदलतो, निर्णय बदलतात मात्र हायटके बसस्थानकाबाबत सर्वच पक्षाने तो झालाच पाहिजे असा ठाम निर्णय घेतला खरा मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. अडीच ते तीन वर्षात हे बांधकाम पूर्णत्वाला जावून प्रवाशांच्या सेवेत सुरू होणे अपेक्षित होते मात्र यातील 1 वर्ष मुळात वाया गेला आहे, संबंधित ठेकेदाराला पेमेंटच न दिल्याने त्यांनी काम थांबविल्याचे एस.टी पशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा आणि हायटेक बसस्थानकाचे काम लवकर पूर्णत्वाला जावून प्रवाशांच्या सेवेत सुरू व्हावे अशी मागणी आता रत्नागिरीकरांकडून केली जात आहे.
रत्नागिरी बसस्थानकाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले मात्र महिनाभरात लगेच थांबविण्यात देखील आले त्यामुळे येथील बसस्थानक रहाटाघर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे एस.टी स्टँड च्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.