नंदीग्राममध्ये ममतांच्या पराभवामुळे बंगालमध्ये परिवर्तन- शाह
लोकांनी 48 तासांपर्यंत डोकं शांत ठेवावे- ममता बॅनर्जी
बंगालच्या राजकीय संघर्षात दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी निवडणुकीचा प्रचार मंगळवारी समाप्त झाला आहे. याचमुळे या अखेरच्या दिनी भाजप आणि तृणमूल काँग्रेसने पूर्ण जोर लावला होता. एकीकडे गृहमंत्री अमित शाह यांनी नंदीग्राममये भाजप उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्यासह रोड शो केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथील भागाबेडामध्ये व्हिलचेअरवर बसून पदयात्रा केली आहे. पदयात्रा सुरू होण्यापूर्वी ममतांचा ताफा शाह यांच्या रोडशोच्या मार्गावरून गेला असता लोकांना जय श्रीराम अशा घोषणा दिल्या आहेत.
नंदीग्राममध्ये ममतांना पराभूत करणे हा पूर्ण बंगालमध्ये परिवर्तन करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. शुभेंदु अधिकारी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन जनतेला करत असल्याचे शाह यांनी रोड शोनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. तर ममतांनी शांततापूर्ण पद्धतीने मतदान करा, पुढील 48 तास तुमचं डोकं शांत ठेवा आणि तृणमूललाच मतदान करा असे आवाहन केले आहे.
ममता बॅनर्जी लक्ष्य
नंदीग्राममध्ये आल्यावर एक दुःखद वृत्त समजले. नंदीग्राममध्ये ममतादीदी वास्तव्य करत असलेल्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. ममता बॅनर्जी येथे असताना असा प्रकार घडत असेल तर त्या मग कुठल्या आधारावर महिला सुरक्षेबद्दल बोलत आहेत. तृणमूलच्या गुंडांनी मारहाण केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू ओढवल्याचे शाह म्हणाले.
200 पेक्षा अधिक जागा जिंकू
ममता बॅनर्जी यांना 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत करणार असल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे. बंगालची जनता परिवर्तन इच्छित असून त्याचा पाया नंदीग्राममधूनच रचला जाणार आहे. भाजप बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचे अमित शाह यांनी सांगितले आहे.
1 एप्रिल रोजी मतदान बंगालमधील सर्वात चर्चेत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात दुसऱया टप्प्यात म्हणजेच 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथे ममतांची लढत भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत होणार आहे. अधिकारी यांनी मागील वर्षी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता.