वृत्तसंस्था/ दुबई
कोरोना महामारीमुळे आयसीसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील काही द्विपक्षीय मालिका लांबणीवर टाकण्यात आल्या असून या मालिकांचे गुण विभागून देण्याबाबत आयसीसीने विचार चालविला आहे.
पुढील महिन्यात आयसीसीच्या होणाऱया क्रिकेट समितीच्या बैठकीमध्ये त्यावर सविस्तर चर्चा केली जाणार असून विविध सदस्यांची मते आजमावली जाणार आहेत. कोरोना समस्येमुळे आयसीसीच्या या पहिल्याच विश्व कसोटी क्रिकेट चॅम्पियनशीपमधील काही संघातील द्विपक्षीय मालिका लांबणीवर टाकाव्या लागल्या. या निर्णयामुळे संबंधित मालिकांमधील दोन्ही संघांत गुण विभागणी करणे हा एकच पर्याय असल्याचे सांगण्यात आले. 2021 च्या मार्चपर्यंत आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सामन्यापुरता गुण विभागणीचा पर्याय ठेवला जाईल, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले.
या स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण ठेवण्यात आले असून या गुणाची संख्या मालिकेतील सामन्यावर राहील. या मालिकेमध्ये दोन, तीन, चार किंवा पाच सामने राहतील. पहिल्या दोन कसोटी मालिकामध्ये गुणांची विभागणी करण्याचा विचार चालू आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील सामना जिंकणाऱयाला 60 गुण तर अनिर्णित सामन्यासाठी 30 गुण राहतील. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी विजयास 40, अनिर्णीत सामन्यास 20 गुण, चार सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक सामन्यातील विजयासाठी 30 गुण तर अनिर्णित सामन्यासाठी 15 गुण दिले जातील. पाच सामन्याच्या मालिकेत प्रत्येक सामन्यातील विजयानंतर त्या संघाला 24 गुण तर अनिर्णित सामन्याला 12 गुण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण आता कोरोना समस्येमुळे या स्पर्धेतील बऱयाच मालिका लांबणीवर टाकण्यात आल्याने गुणांची विभागणी करण्याकरिता आयसीसीला कसरत करावी लागणार आहे.