वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशांतर्गत विमानसेवा सध्या सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह इतर काळजी घेत कंपन्या सेवा देत आहेत. यादरम्यान विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या तिकीटांचे प्रवाशांचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे.
इंडिगो व एअर एशिया इंडिया या कंपन्यांनी प्रवासाच्या तिकीटांचे पैसे ग्राहकांना परत देण्यास सुरूवात केली आहे. जी विमाने रद्द झाली होती त्या तिकीटाचे पैसे ग्राहकांना परत केले जात आहेत. त्यामुळे तमाम तिकीट रद्द झालेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कंपन्यांनी तिकीटांचे पैसे ट्रव्हल एजंटना वितरीत केल्याने एजंट समाधानी आहेत. टप्प्याटप्प्याने ग्राहकांना पैसे परत केले जातील.
एअर इंडियाची प्रवाशांना संधी
एअर इंडिया कंपनीने विमान प्रवासाच्या रद्द केलेल्या तिकीटावर पुढच्या काळात प्रवास विनाशुल्क करण्याची संधी उपलब्ध केली आहे. एअर इंडिया कंपनीची तिकीटे रद्द झालेल्या प्रवाशांना पुढच्या काळात प्रवास करता येणार आहे. 23 मार्च ते 31 मे दरम्यान ज्या प्रवाशांचे तिकीट रद्द झाले आहे त्यांना 25 मे 24 ऑगस्ट या काळात संबंधीत ठिकाणी विमानाने प्रवास करता येणार आहे. याकरिता प्रवाशांना जादा शुल्क द्यावे लागणार नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
बोइंग देणार 12 हजार जणांना नारळ
बोइंग कंपनी येणाऱया काळात 12 हजार जणांना कमी करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान सेवेला गेल्या एप्रिलपासून मोठा फटका बसला आहे.
अमेरिकेतील बोइंग कंपनीला फटका बसला असून या कंपनीला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घ्यावा लागत आहे. या आठवडय़ात 6 हजार 770 जणांना कमी केले जाणार असून आणखी 5 हजार जणांना नारळ दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते.