पावसाचा फटका, सुगी हंगाम लांबणीवर
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने शनिवारी काही प्रमाणात उघडीप दिली. त्यामुळे भात कापणी झालेल्या शिवारात शेतकऱयांनी रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ केला. माळरानावरील बटाटा, रताळी व भात कापणी पूर्ण झाली आहे. बळीराजा शिवारातील भातकापणीकडे वळला असतानाच अवकाळी पावसाने जोर वाढविल्याने सुगी हंगामात व्यत्यय निर्माण झाला तर काही ठिकाणी भात कापणी झालेल्या शिवारात पाणी साचल्याने शेतकऱयांची चिंता वाढली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील उचगाव, बेकीनकेरे, अतिवाड, गोजगा, मण्णूर, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, अगसगा, कोनेवाडी आदी भागातील भात कापणी झालेले शेतकरी कडधान्याची पेरणी करताना दिसत आहेत. मात्र बी-बियाणाचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान मिळेल त्या बियाणांचा (कडधान्यांचा) वापर करून रब्बी हंगाम साधताना शेतकरी दिसत आहे. तालुक्मयात भात कापणीनंतर रब्बी हंगामात मोठय़ा प्रमाणात कडधान्यांची पेरणी केली जाते. विशेष करून मसूर, हरभरा, वाटाण्यांची पेरणी केली जाते. याबरोबरच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, याकरिता शाळू, जोंधळा, मका, बाजरीची देखील पेरणी केली जात आहे.
अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सुगी हंगाम लांबणीवर पडला आहे. तसेच रब्बी हंगामातील पेरणीतदेखील व्यत्यय येत आहे. काही ठिकाणी अधिक पाऊस झाल्याने पेरणीत अडथळा निर्माण होत आहे. तसेच ढगाळ वातावरण असल्याने कामेही थांबली आहेत. त्यामुळे बळीराजा उघडीपीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरण कमी होताच सुगी हंगामाची सगळीकडे धांदल उडणार आहे.