कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियम : नमाजवेळी सामाजिक अंतर सक्तीचे
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने विविध सण सार्वजनिकपणे साजरे करण्यावर निर्बंध घातले होते. आता रमजानच्या पार्श्वभूमीवर नवी मार्गसूची जारी केली असून सामूहिक प्रार्थनेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबरोबरच इफ्तार पार्टी घरातच करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे. मागील वर्षी देखील एप्रिल महिन्यात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने सणांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते.
मंगळवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ झाला आहे. राज्यातही कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने रमजानसाठी राज्य सरकारकडून मार्गसूची जारी करण्यात आली आहे. नमाजवेळी सामाजिक अंतर राखण्यासह मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन टप्प्यात नमाज पठण
तीन टप्प्यात नमाज पठण करण्याचा पर्याय सुचविण्यात आला असून दुपारी 12.45 ते 1.15, 1.30 ते 2 आणि 2.30 ते 3 अशा तीन टप्प्यात नमाज पठण करता येईल. नमाजपूर्वी 5 मिनिटे अगोदर मशिद उघडण्याची आणि नमाजनंतर बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
60 वर्षांवरील व्यक्ती, लहान मुलांना मशिदीमध्ये निर्बंध
उपवास सोडताना देखील मशिदीमध्ये आहाराच्या वस्तू आणू नयेत. घरातच उपवास सोडावा. सामूहिक प्रार्थनेवेळी दोन व्यक्तींमध्ये किमान 2 मीटर अंतर असावे. त्यासाठी मार्किंग करावे. अंतराच्या नियमाचे पालन करणे सक्तीचे आहे. मशिदीमध्ये रांगेने प्रवेश करावा, मास्कचा वापर सक्तीने करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील व्यक्तींनी आणि लहान मुलांनी मशिदीमध्ये येऊ नये, अशी सूचना मार्गसूचीद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाचे अधिक रुग्ण असलेल्या भागांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा भागातील मशिदी पुढील आदेशापर्यंत उघडू नयेत. सार्वजनिकपणे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, इफ्तार पार्टी घरात करता येईल, असा उल्लेख सरकारने आदेशात केला आहे.