रयतचे अध्यक्ष शरद पवार यांची अपेक्षा, रयत शिक्षण संस्थेतर्फे कृतज्ञता सत्कार
प्रतिनिधी/ सातारा
कर्मवीर अण्णानी आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. रयत शिक्षण संस्था ही देशातील सगळ्यात महत्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात रयत शिक्षण संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होत असताना जगातल्या बदलाची नोंद घेऊन आता नवे बदल केले पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय संपूर्ण जगात विविध क्षेत्रात प्रचंड प्रमाणात प्रसारित होत आहे. शेती, उद्योग, संशोधन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात काम करणारी नवी पिढी आपल्याला तयार करावयाची आहे. त्यासाठी मायक्रोसॉफटचे अधिकारी तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी चर्चा केलेली आहे. तसेच आय.बी.एम. ही जगातली या क्षेत्रात काम करणारी मोठी कंपनी असून तिच्याशी रयतेचा करार व्हावा. रयत शिक्षण संस्थेने यापुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शिक्षण द्यावे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदराव पवार यांनी व्यक्त केले.
साताऱयात स्व. यशवंतराव चव्हाण सभाग़ृहात रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच 82 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांचा विशेष अभिष्टचिंतन व कृतज्ञता सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, सुभाष शिंदे, रयतेचे व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, डॉ मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, आज खरे म्हणजे आगळा वेगळा समारंभ आहे. गुणवत्ता कशी आणायची हे माशेलकर यांनी दाखवले आहे. कर्मवीर आण्णा घरी आले अन् त्यांची चर्चा मी ऐकत होतो. माझ्या वडिलांशी ते चर्चा करत होते. अण्णांनी विचारले गोविंदराव मुलगा कुठं शिकतो, त्यांनी सांगितले इथंच. त्याचवेळी निर्णय झाला. बारामती येथे शाहू हायस्कूल सुरू झालं अन् पुढे माझं शिक्षण सुरू झाले. पण शिक्षण सोडून इतर ठिकाणी लक्ष असायचे. त्याचवेळी महात्मा गांधी विद्यालय येथे शिक्षणासाठी गेलो. सांगायचं तात्पर्य रयतमध्ये लाखो विद्यार्थी शिकून पुढे गेले. सामन्यासाठी ज्यांनी कष्ट केलं ती रयत शिक्षण संस्था आहे. रयत सुरुवातीच्या काळातली अन् आज एक एका वेगळ्या वळणावर आहे. जगातील बदलाची नोंद घेऊन आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. रयतमध्ये अत्याधुनिक असे शिक्षण द्यायचे आहे. आय.व्ही.एम. ही जगातील मोठी कंपनी आहे. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना सातारला घेऊन येणार आहे त्यामुळे त्यांच्याशी ही करार व्हावा ही माझी इच्छा आहे. आज जो विद्यार्थी 10 वी, 12 वी किंवा पोस्ट गॅज्युएट होत आहेत. त्यावेळी त्याने एक विषय आय.व्ही.एम. करावा. हा कोर्स 19 हजारचा आहे. 100 विद्यार्थी दिले तर कुठेही काम करायची तयारी असेल तर त्याला जॉब आम्ही देऊ. यासाठी मानसिकता महत्वाची आहे. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था उभी केली पण त्यावेळची स्थिती शिक्षित अन् अशिक्षित होती पण आज स्थिती वेगळी आहे. रयतेच्या माध्यमांतून वैचारिक दृष्टीकोन महत्वाचा, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, साताऱयात उत्कृष्ट संघटन म्हणून किसन वीर आबांकडे पाहिले जाते. आबा हे सर्वसामान्य कुटुबांतील होते. त्यांच्याबरोबरच स्व. यशवंतराव चव्हाण यांचा विचार पुढे नेता आला. सार्वजनिक जीवनात राज्य पातळीवर काम करताना साताऱयाच विजय कसा राहील हे पहात गेलो. सातारचे ऋण मी विसरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी आपले मते व्यक्त केली. मानपत्राचे वाचन शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. रयत ग्रंथाचे प्रकाशन झाले. शरद पवार यांचे विविध भावमुद्राचे कॉफी टेबल बुक प्रकाशन करण्यात आले. सुवर्ण बिंदू रयत वाणी कम्युनिट रेडिओचे प्रकाशन झाले. रामशेठ ठाकूर यांच्याकडून 5 कोटींचा धनादेश शरद पवार यांना दिला. प्रास्ताविक, स्वागत प्राचार्य विठ्ठल शिवणकर यांनी केले.
माझे कुटुंब सातारा जिल्हय़ातीलच
व्यक्तीगत माझ्या जीवनात साताऱयाचे आणि माझे जिव्हाळय़ाचे नाते आहे. खरे म्हणले तर सातारा हे माझे घरच आहे. माझे कुटुंबच सातारा जिह्यातील आहे. काही कारणास्तव आमच्या कुटुबियांना बाहेर जावे लागले. आमचे मुळ गाव सातारा जिह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ. राजकीय क्षेत्रातील माझ्या सुरुवातीच्या काळात एकच आदर्श व्यक्ती होती ती म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब. माझे सर्व कुटुंब हे शेकापमध्ये होते आणि मी मात्र काँग्रेसमध्ये एकटा होतो, अशा जुना आठवणींना उजाळा देत राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी भावनिक साद सातारकरांना दिली.