वार्ताहर / पुसेगाव :
खासदार शरद पवार यांचे रयत शिक्षण संस्थेमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून तिची नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे राजकारण संपेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला आहे.
कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी मागील दोन चार दिवसांपासून रयत शिक्षण संस्था आणि खा. शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. या टीकेला आ. शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली होती. सध्याच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात ही संस्था टिकविण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केले. शैक्षणिक स्पर्धेत दर्जा आणि सुविधा देण्याचे काम सरकारचे असून अनुदान असे कितीसे मिळते. यापेक्षा 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी केवळ शरद पवारांच्या आवाहनावरुन मिळतो.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक व आर्थिक मदत करीत व आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच इतर बाबतीत मदत करतात. पण, ते याचा कधीही गवगवा करीत नाहीत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेवर बोलताना रयतेचा परिवार हा जिल्ह्यापुरता नसून महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे, याचे भान ठेवावे. केवळ शरद पवार यांचा पाठिंबा आहे, म्हणून ही संस्था आधुनिकतेच्या पायावर उभी असून यशस्वी वाटचाल करीत आहे. या संस्थेमुळे सातारा शहरासह जिल्ह्याचा दर्जा सुधारला आहे. पण, टीका करताना आपण कोणावर टीका करतो याचे भान ठेवावे, असा सल्ला आ. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.