भारतीय क्रिकेट संघाचा नूतन टी-20 कर्णधार रोहित शर्माचे प्रतिपादन
कोलकाता / वृत्तसंस्था
‘टी-20 लढतीत संघाला ब्रेकथ्रूची गरज असते, त्यावेळी रविचंद्रन अश्विन हा नेहमीच आक्रमक पर्याय असतो’, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा नवा टी-20 कर्णधार रोहित शर्माने केले. भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 3-0 असा एकतर्फी विजय संपादन केला. त्यानंतर रोहित माध्यमांना संबोधित करत होता.
अलीकडेच संपन्न झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून 35 वर्षीय रविचंद्रन अश्विनने पुनरागमन नोंदवले. अश्विन यावेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 4 वर्षांनंतर प्रथमच खेळला.
‘मधल्या षटकात बळी घेण्यासाठी अश्विनसारखा खेळाडू संघात उपलब्ध असेल तर ती निश्चितच जमेची बाजू असते. दुबईत खेळल्यानंतर त्याने उत्तम पुनरागमन नोंदवले असून तो नेहमीच अव्वल दर्जाचा गोलंदाज राहिला आहे. त्याने कसोटी व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे’, असे रोहित याप्रसंगी पुढे म्हणाला.
अश्विनने जयपूर व रांचीतील पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे 4-0-23-2 व 4-0-19-1 असे गोलंदाजी पृथक्करण नोंदवले. त्याने अक्षर पटेलच्या साथीने मधल्या षटकात प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
प्रशिक्षकपदी द्रविड व कर्णधारपदी स्वतः विराजमान होताना ड्रेसिंगरुममधील वातावरण हलकेफुलके असावे, यावर आपला भर असेल, असे रोहित आवर्जून म्हणाला.
‘खेळाडूंच्या मनात कोणतीही भीती असू नये आणि त्यांनी मैदानावर बेधडक खेळ साकारावा, यासाठी ड्रेसिंगरुममधील वातावरण अनुकूल असावे, असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही पहिल्या टीम मिटींगमध्ये यावर पूर्ण भर दिला. संघासाठी जे योगदान दिले, त्याची निश्चितपणाने दखल घेतली जाईल, हे आम्ही खेळाडूंच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. भारतात बरीच गुणवत्ता असल्याने अनेक पर्याय आजमावून पहावे लागतात आणि यातून सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड करणे कठीण असते’, असे रोहितने एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.