अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार 13 जुलै 2021, सकाळी 11.30
● सोमवारी रात्री अहवालात 814 बाधित ● एकूण 11,987 जणांची तपासणी ● जिल्हय़ात 2,869 बेड रिक्त● लॉकडाऊनमध्ये जगरहाटीला गती ● सामान्यांना लॉकडाऊन संपण्याचे वेध ● वेग मंदावलेल्या तालुक्यांचे निर्बंध कमी करा
सातारा / प्रतिनिधी :
रविवारी सुट्टी असल्याने कदाचित केवळ 576 एवढया कमी संख्येने बाधित समोर आल्याचा दिलासा लाभला. या अहवालात कोरोनामुक्ती फक्त 172 एवढीच होती. त्यामुळे मात्र ही सुट्टीची गोष्ट खरी ठरली कारण सोमवारी रात्री आलेल्या अहवालात 814 जणांचा अहवाल बाधित आला. त्यामुळे दीड महिन्यापासून सुरू असलेला तीन अंकी बाधित वाढीचा रतीब तसाच सुरू राहिला आहे. मुंबई-पुण्यात 500 च्या पटीत बाधित वाढ तर साताऱ्यात ती 800 च्या पटीत वाढत आहे. पॉझिटिव्हीटी दर खाली घसल्याने दुसऱ्या लाटेतून लवकरच मुक्तता मिळण्याचे संकेत दिसू लागलेले असताना पुन्हा आकडेवारीचा खेळ सुरू असून आता लॉकडाऊनचा खेळ बंद करा अशी नागरिकांची मागणी असून, सर्वांना लॉकडाऊन संपण्याचे वेध लागलेले आहेत.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर वाढला
गेल्या अनेक दिवसांपासून पॉझिटिव्ही दराचा आलेख चढता असल्याने पुन्हा लॉकडाऊनची तलवार जिल्हावासियांच्या डोक्यावर पडली. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाधित वाडीचा आलेख तीन अंकी संख्येवर स्थिर आहे. त्याला दैनंदिन रतीब म्हणण्याची वेळ परिस्थितीने आणलेली आहे. दरम्यान सोमवारी रात्रीच्या अहवालात एकूण 11,987 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्येेे 814 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
लॉकडाऊन असला तरी जगरहाटीला गती
गेल्या काही दिवसांपासून सकाळी 9 ते 2 सवलत दिली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांसह कृषी केंद्रे सुरु असली तरी या सवलतीच्या काळात इतर दुकानदारही ग्राहकांना खुश्कीच्या मार्गाने साहित्य पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहकदेखील त्याला प्रतिसाद देत असल्याने या साटय़ालोटय़ामुळे जगरहाटीला सवलतीच्या वेळेत चांगली गती येत आहे. दोन नंतर देखील रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरुच असते. त्यातच कमी होत असलेली बाधित वाढीची संख्या यामुळे आता लॉकडाऊन संपण्याचे वेध लोकांना लागलेले आहेत.
नियम पाळून सर्व गोष्टी खुल्या करा
लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर काळी ज्या पध्दतीने अत्यावश्यक सेवांना सवलत दिली जाते. मात्र याच काळात मग नागरिकांची गर्दी होत असते. ग्रामीण भागातील लोक देखील याच काळात शहरात व बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. त्यापेक्षा सर्व गोष्टींना खुली परवानगी द्या आणि मास्क, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या गोष्टी पाळण्याची हमी नागरिक, व्यापारी घेत असतील नियम पाळून जगरहाटी सुरु करा. त्यामुळे बाजारपेठेत नियमाच्या बंधनाने होत असलेली गर्दी टळेल, अशीही सूचना नागरिक करत आहेत.
वेग मंदावलेल्या तालुक्यांचे निर्बंध कमी करा
सातारा व कराड तालुक्यांमध्ये वाढीत रुग्ण संख्या आहे. मात्र, इतर फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, माण, पाटण तालुके दोन अंकी संख्येवर आलेत. तर जावली एक अंकी संख्येवर आली असून महाबळेश्वर तालुका निरंक राहू लागला आहे. ज्या तालुक्यांमध्ये बाधित वाढीचा वेग कमी आला आहे तिथे नियम पाळण्याचे बंधन घालून निर्बंध कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
काही व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट
लॉकडाऊन केल्याने मग काही गोष्टींमध्ये काळाबाजार वाढत आहे. काही दुकानदार अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करत असल्याने नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. दारु दुकाने बंद असल्याने त्याचाही काळाबाजार वाढतो आहे. बंदी, गर्दीचे शास्त्र समजावून आता यापुढे कोरोनाबरोबर काळजी घेत जगण्याचे आव्हान सर्वांनाच पेलावे लागणार असून लूट करण्याची वृत्ती रोखण्यासाठी लॉकडाऊन ऐवजी इतर उपायबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरजही व्यक्त होत आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 11,89,520, एकूण बाधित 2,03,788, एकूण कोरोनामुक्त 1,90,477, मृत्यू 4,917, उपचारार्थ रुग्ण 9,242
सोमवारी जिल्हय़ात बाधित 576, मुक्त 1,246, बळी 11