राज्यात ‘टीका उत्सव 3’ ला प्रतिसाद : 18 ते 44 वयोगटात 6801 जणांचे लसीकरण,अन्य वयोगटात 496 जणांना दुसरा डोस
प्रतिनिधी / पणजी
कोरोना लसीकरणाच्या काल रविवारी प्रारंभ झालेल्या तिसऱया टप्प्यातील टीका उत्सवास पहिल्या दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून राज्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील 6801 जणांनी लस घेतली. त्याशिवाय दिवसभरात 11365 जणांनी पहिला डोस तर 496 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
16 जानेवारीपासून राज्यात कोरोना लसीकरण प्रारंभ करण्यात आले होते. त्या दरम्यान सरकारने ग्राम तसेच पालिका पातळीवर लसीकरण करण्यासाठी टीका उत्सवांचे आयोजन केले. त्या मालिकेतील तिसरा टीका उत्सव काल दि. 13 जून पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
रविवारपर्यंत 6,27,881 जणांचे लसीकरण
राज्यात एकूण 87 लसीकरण केंद्रे असून त्यातील 39 केंद्रे राज्यातील विविध आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी तर अन्य तात्पुरती आहेत. ही तात्पुरती केंद्रे पंचायत आणि पालिका पातळीवर स्थापन करण्यात आली आहेत. राज्यात दि. 13 जून पर्यंत 6,27,881 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
टीका उत्सवामुळे लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद व गती मिळाली आहे. हे प्रमाण असेच राहिल्यास जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे ध्येय पूर्ण करणे शक्य होणार आहे.
कोरोना 420 बाधित, 14 बळी सक्रिय रुग्णसंख्या 4882 बरे होण्याचे प्रमाण 95.19 टक्के
राज्यात कोरोनामुळे काल रविवारी 14 जण दगावले असून बळींची संख्या 2928 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 420 नवीन बाधित सापडले तर 581 जण बरे झाले आहेत. त्यायोगे बरे होण्याचे प्रमाण 95.19 टक्क्यांवर वर पोहोचले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 4882 एवढी खाली आली आहे.
गेल्या वर्षभरातील बाधितसंख्या 162468 वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण 154658 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी 3002 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 420 बाधित सापडले. त्यातील 50 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 370 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
रविवारी बळी गेलेल्या 14 जणांसह एकूण बळींची संख्या 2928 वर पोहोचली आहे. त्यातील 12 जण गोमेकॉत दगावले. त्याशिवाय हॉस्पिसियो इस्पितळात एका व्यक्तीस मृत आणण्यात आले तर उत्तर गोव्यातील खाजगी इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 40 पासून 84 वर्षे वयोगटातील 7 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे.
फोंडा केंद्रात 466 रुग्ण
राज्यातील 33 पैकी फोंडा केंद्रात सध्या सर्वाधिक 466 रुग्ण उपचार घेत आहेत. त्या खालोखाल मडगावात 347, चिंबल 268 तर पणजीत 255 रुग्ण आहेत. सध्या सर्वात कमी 29 रुग्ण कासारवर्णेत आहेत. डिचोली, हळदोणे, बेतकी, कासारवर्णे, कोलवाळ, शिवोली, मये या केंद्रांमधील रुग्णसंख्या दोन अंकी संख्येवर आली आहे.