प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून सर्व व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. 10 नंतर काही प्रमाणात बाजारात नागरिक खरेदीसाठी दाखल होत होते. परंतु शनिवारच्या मानाने बाजारात अत्यंत कमी वर्दळ होती. नागरिकांनी रविवार असल्याने घरीच राहणे पसंत केले. यामुळे विपेत्यांना ग्राहकांची वाट पाहत बसावी लागत होती.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने चौथ्या लॉकडाऊनवेळी दोन रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. 24 रोजी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. परंतु शनिवारी राज्य सरकारने रविवार दि. 31 रोजी सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊन आर्थिक चक्र व्यवस्थित होते, यासाठी राज्य सरकारचा हा प्रयत्न होता.
गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कांदा मार्केट, रविवार पेठ, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, काकतीवेस या भागामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वर्दळ होती. भाजीपाला, फळे, कडधान्य, गृहोपयोगी साहित्याच्या दुकानात काही प्रमाणात गर्दी होती. उर्वरित दुकानांमध्ये शुकशुकाट पसरला होता. शनिवारच्या मानाने अत्यंत कमी विपेतेही दाखल झाले होते. दुपारनंतर आलेला रिमझिम पाऊस व ग्राहकांची कमतरता यामुळे अनेकांनी दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले.
शनिवारीच अनेकांनी केली खरेदी
रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आहे. असा समज झाल्यामुळे अनेकांनी शनिवारीच खरेदी केली. यामुळे बाजारामध्ये मोठी गर्दी झाली होती. शनिवारी दुपारनंतर प्रशासनाने रविवारचा लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला. उशिराने निर्णय झाल्याने त्यापूर्वी ग्रामीण भागातील विपेते व ग्राहक शहरात दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत खरेदीचा जोर सुरू होता. याचा परिणाम रविवारी दिसून आला.