नियमांचे पालन न झाल्याने प्रशासनाचा निर्णय, 3 मे पर्यंत राहणार बंद
प्रतिनिधी/ बेळगाव
रविवार पेठमधील व्यापार पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने सोमवारी घेतला आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले रविवार पेठ मधील व्यवहार सोमवारपासून बंद ठेवण्यात आले असून 3 मे पर्यंत रविवार पेठ बंद राहणार आहे. लॉकडाऊनमध्येही रविवार पेठ सुरु ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र या ठिकाणी नियमांचे पालन न झाल्याने रविवार पेठ पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरक्षित अंतर न राखणे, गर्दी करणे, तोंडाला मास्क न लावणे असे प्रकार झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे. गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन सुरु असल्याने या काळात जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱयांना बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. तर ग्रामीण भागासह शहरातील बऱयाच भागातील किराणा दुकानातील जीवनावश्यक वस्तू (माल) संपल्या आहेत. यामुळे रविवार पेठ मधील दुकाने सुरु करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी वर्गाने केली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली होती. यामुळे प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि. 23 पासून सायंकाळच्या वेळेत रविवार पेठेतील होलसेल दुकाने सुरु करण्यासाठी येथील व्यापाऱयांना परवानगी देण्यात आली होती. यावेळी किरकोळ विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करण्याची सूचना व्यापारी वर्गास केली होती. मात्र रविवार पेठ मधील दुकाने सुरु होताच या ठिकाणी खरेदीसाठी एकच गर्दी झाली. यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्यात आले नाही. तसेच यामुळे रहदारीची कोंडीही झाली. याबाबत अनेक नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पोलिसांनी वारंवार याबाबत व्यापारी वर्गाला सूचना केली होती. सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत दुकाने सुरु ठेवणे तर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत माल उतरवणे आणि भरण्यासाठी येथील व्यापारी वर्गास परवानगी देण्यात आली होती. मात्र होलसेल तसेच किरकोळ विपेत्यांसह रविवार पेठेत येणाऱया ग्राहकांनीही नियमांचे पालन केले नाही. यामुळे गेले चार दिवस रविवार पेठेतील परिसरात सायंकाळनंतर गर्दी होत होती. यामुळे सोमवारी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत लॉकडाऊन खुले होईस्तोवर रविवार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सोमवारी सायंकाळी रविवार पेठेत पुन्हा शुकशुकाट जाणवला.