सोनेपत जिल्हय़ातील नहरी खेडय़ातील 15 हजार ग्रामस्थांना ऑलिम्पिक कुस्तीचे वेध
सोनेपत-हरियाणा / वृत्तसंस्था
एखाद्या मल्लाचे ऑलिम्पिकमधील यश एखाद्या खेडय़ाचे भविष्य बदलू शकते का? सोनेपत जिल्हय़ातील नहरी या 15 हजार लोकवस्तीला तरी असेच वाटते आणि याला कारण आहे याच खेडय़ातून ऑलिम्पिकपर्यंत धडकलेला भारताचा आघाडीचा मल्ल रवि दहिया!
तसे पाहता, नहरी या खेडय़ातील लोकांना पिण्याचे पाणीही पुरेसे मिळत नाही. दिवसभरात केवळ दोनच तास वीज पुरवठा होतो. गावात केवळ एकच पशू वैद्यकीय केंद्र आहे आणि या प्रतिकूल स्थितीशी झगडत आलेल्या नहरीला रवि दहिया ऑलिम्पिक पदकासह टोकियोतून परत यावा, असे वाटते.
आश्चर्य म्हणजे नहरी या खेडय़ातून ऑलिम्पिकमध्ये धडक मारणारा हा चक्क तिसरा ऑलिम्पियन आहे. यापूर्वी महावीर सिंग (1980 मॉस्को, 1984 लॉस एंजिल्स) व अमित दहिया (लंडन 2012) यांनी हा पराक्रम गाजवला. मात्र, आता 24 वर्षीय रविने पदक जिंकले तर नहरीचे भविष्यही बदलू शकते, असा विश्वास या गावातील नागरिकांना का वाटतो, त्याचेही खास कारण आहे.
ऑलिम्पियन महावीर सिंग यांनी दोनवेळा ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवी लाल यांची भेट घेत नहरी येथे पशू वैद्यकीय केंद्र सुरु करावे, अशी विनंती केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली. आता रवि दहियाने जर पदक जिंकले तर नहरी पुन्हा एकदा प्रकाशझोतात येईल आणि 4 हजार कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या या गावात काही विकासाभिमुख प्रकल्प येतील, अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे.
नहरीचे ग्रामस्थ रवि दहियाबद्दल आशावादी आहेत. मात्र, हे यश त्याचे वडील राकेश कुमार दहिया यांचे अनेक त्याग व मनोबल उंचावणारे मार्गदर्शन यासाठी देखील विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. रविचे वडील खंडावर घेतलेल्या शेतात वर्षानुवर्षे प्रचंड मेहनत घेत आले आहेत. पण, रविच्या सरावाला त्यांचे नेहमीच पाठबळ राहिले आहे. नहरीपासून 60 किलोमीटर्स अंतरावर असलेल्या छत्रसाल स्टेडियमवर रविचे वडील स्वतः दूध आणि लोणी घेऊन पोहोचायचे, त्यावेळी त्याच्या तयारीत कोणतीही कसर राहू नये, हेच त्यांचे प्रामाणिक प्रयत्न राहिले.
साडेतीन वाजताच पायपीट सुरु
रविचे वडील त्यावेळी साडेतीन वाजता उठायचे, 5 किलोमीटर्स चालत जवळचे रेल्वे स्टेशन गाठायचे, आझादपूरला उतरायचे आणि तिथून पुन्हा 2 किलोमीटर चालत छत्रसाल स्टेडियमला पोहोचायचे. रवि तेथे महाबली सत्पाल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सराव करत असे. त्यानंतर ते पुन्हा शेतावर परतायचे आणि काबाडकष्ट सुरु होत असे. हा दिनक्रम 12 वर्षे सुरु राहिला. 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे यात खंड पडला.
6 व्या वर्षी कुस्तीचे धडे
रवि 6 वर्षांचा असताना त्याला त्याच्या वडिलांनी कुस्तीची ओळख करुन दिली. हंसराज यांच्या आखाडय़ात रविने कुस्तीचे धडे गिरवले. रविचे एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे ऑलिम्पिक पदक जिंकणे. त्याला दुसरे काहीच माहीत नाही, असे त्याचे वडील अभिमानाने सांगतात.
दिल्ली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असलेले रविचे काका अनिल दहिया म्हणाले, ‘एक दिवस तो घरी परतल्यानंतर मी त्याला मोटारसायकल शिकवतो, असे म्हणालो. पण, त्याने नकार दिला. आपल्याला आवश्यकता नाही, असे त्याने उत्तर दिले. तो युवा आहे. पण, त्याला कुस्तीशिवाय कशातच स्वारस्य नाही. नवे कपडे, बूट, असा कोणताही शौक नाही. तो फक्त कुस्तीबद्दल बोलत असतो. कुस्ती हेच त्याचे आयुष्य आहे.