बजरंग पुनियाची अंतिम लढतीतून माघार, नरसिंग यादव, सत्यवर्त कादियन, करण यांना कांस्य
वृत्तसंस्था/ अल्माटी, कझाकस्तान
उत्तम बचावाचे प्रदर्शन करीत भारताच्या दीपक पुनियाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये 86 किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवित पहिले पदक निश्चित केले आहे. 61 किलो वजन गटात रविंदर व 92 किलो वजन गटात संजीत यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. त्याआधी रवि कुमार दाहियाने 57 किलो गटाचे सुवर्णपदक स्वतःकडेच राखले तर बजरंग पुनियाने अंतिम लढतीतून माघार घेतल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दीपकने कोरियाच्या ग्वानुक किमवर 2-0 असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. किमने अनेकदा डबल लेग ऍटॅक केले. पण दीपकच्या भक्कम बचावामुळे त्याला त्याचा लाभ झाला नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळवित दीपकने ऑलिम्पिक स्थान निश्चित केले होते. किमने हालचाली न केल्याने दोनदा त्याला दंड करण्यात आला, याच गुणावर दीपक विजयी झाला. दीपकच्या या बचावात्मक धोरणामुळेच उझ्बेकच्या इसा शापिएव्ह (9-2), ताजिकिस्तानच्या बखोदुर कोडिरोव्ह (4-3) यांच्यावर विजय मिळवले होते.
61 किलो वजन गटात रविंदरने इराणच्या माजिद अलमास दस्तानवर 4-3 असा विजय मिळवित सुरुवात केली. पण उपांत्य फेरीत त्याला कझाकच्या अदलान आकारोव्हकडून 4-7 असा पराभव स्वीकारावा लागला. दस्तान सतत आक्रमक खेळ करीत होता. त्यामुळे दुसऱया फेरीत तो भोवळ येऊन पडला. पण रविंदरला त्याचा लाभ घेता आला नाही. किर्गीझस्तानच्या इक्रोमझोन खाझिमुरोडोव्हविरुद्ध रविंदरची कांस्यपदकासाठी लढत होईल.
92 किलो गटाच्या लढतीत संजीतने जपानच्या रोइची यामानाकावर 9-4 असा विजय मिळवित सुरुवात केली. पण नंतर इराणच्या कामरान घोरबन घासेमपूरविरुद्ध त्याचा निभाव लागला नाही. कामरानने तांत्रिक सरसतेच्या आधारे विजय मिळविला. उझ्बेकच्या रुस्तम शोडिएव्हविरुद्ध संजीतची कांस्यपदकाची लढत होणार आहे. 74 किलो गटात राष्ट्रीय चॅम्पियन संदीप सिंग मान व सुमित मलिक (125 किलो) यांना पदकाच्या फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. संदीपला तुर्कमेनिस्तानच्या चार्लीयेव्हकडून 4-5, तर सुमितला उपांत्यपूर्व फेरीत ओलेग बोल्टिनकडून 1-7 असा पराभव स्वीकारावा लागला.
रवि कुमार दाहियाने शनिवारी प्रतिस्पर्ध्यावर चमकदार प्रदर्शन करीत विजय मिळवित या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पटकावले. बजरंगने मात्र उजव्या हाताच्या कोपऱयाला झालेली दुखापत चिघळू नये, यासाठी अंतिम लढतीतून माघार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे जपानच्या ताकुतो ओटोगुरोला सुवर्णपदक देण्यात आले. ‘कोरियन खेळाविरुद्धच्या लढतीवेळी उजव्या हाताच्या कोपराला वेदना होऊ लागल्या होत्या. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतही याच हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे मी माघारीचा निर्णय घेतला,’ असे बजरंगने सांगितले.
नरसिंग यादव (79 किलो), करण (70 किलो), सत्यवर्त कादियन (97 किलो) यांनीही कांस्यपदके पटकावली. शनिवारी भारताचे पाच मल्ल मैदानात उतरले होते आणि पाचही जणांना पदके मिळाली.