मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच मैदानात उतरेल, अशी ग्वाही या संघाचा हंगामी नेता केरॉन पोलार्डने शनिवारी दिली. पण, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयातून रोहितसारख्या तडाखेबंद फलंदाजाला का वगळले, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. बीसीसीआयने रोहितच्या सध्याच्या दुखापतीकडे अंगुलीनिर्देश केला असला तरी प्रत्यक्ष दौऱयाला बराच कालावधी बाकी असल्याने रोहित त्यातून सावरु शकला असता, असे प्रातिनिधिक चित्र होते. रोहितला भारतीय संघातून वगळण्याच्या त्या निर्णयावर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत जरुर व्यक्त केले. मात्र, त्यांनी याबद्दल थेट काहीही मतप्रदर्शन मांडले नाही. शास्त्राr याप्रसंगी म्हणाले, ‘संघातील निवडीबाबत मला माझे मत निवड समितीकडे मांडण्याचा अधिकार नाही. पण, वैद्यकीय पथकाने जो अहवाल दिला, त्यानुसार, रोहितला पुन्हा लवकर खेळवण्याची घाई केली तर त्याची दुखापत चिघळू शकते’.
मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा सध्या धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरत आहे आणि मागील काही सामन्यात तो खेळू शकलेला नाही. पण, निवड समितीने त्याची सध्याची दुखापत पाहता त्याला आगामी दौऱयातून वगळण्याचा निर्णय क्रिकेट वर्तुळासाठी धक्कादायक ठरला.
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय पथकातील सदस्यांचे असे मत आहे की, रोहितची दुखापत पुन्हा चिघळू शकते. त्यांनी जो अहवाल दिला, त्यानुसार निवड समितीने हा निर्णय घेतला. मला निवडीबाबत मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही आणि मी निवड समितीचा भागही नाही’, असे शास्री पुढे म्हणाले. रोहितने दुखापतीविषयी अधिक काळजी घ्यायला हवी, याचाही त्यांनी उल्लेख केला आणि स्वतःच्या कारकिर्दीतील उदाहरण दिले.
‘माझ्या कारकिर्दीची सांगता 1991 मध्ये झाली. खरं तर मी त्यावेळी 3-4 महिने विश्रांती घेतली असती तर आणखी किमान पाच वर्षे सहज खेळू शकलो असतो. वास्तविक, मला त्यावेळी डॉक्टरांनी दौऱयावर न जाण्याचा सल्ला दिला होता. पण, तो मी पाळला नाही. मी उत्तम बहरात होतो. त्यामुळे मी धोका पत्करला. पण, त्यामुळे माझे नुकसान झाले. रोहितची दुखापत त्या तुलनेत तितकी गंभीर नाही. तरीही, त्याने वैद्यकीय पथकाचा सल्ला विचारात घेणे अधिक योग्य ठरेल’, असे शास्त्री म्हणाले.