पत्रकारांसह पुतीन विरोधात आवाज उठविणारे लोक लक्ष्य
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची तीव्रता वाढत चालली आहे. या हल्ल्यात मोठय़ा संख्येत नागरिकांनाही नुकसान पोहोचत आहे. अनेक शहरे आता उद्ध्वस्त झाली आहेत. लोक जीव वाचविण्यासाठी अन्यत्र पलायन करत आहेत. याचदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाने रशियाचे सैनिक लोकांचे अपहरण करत असल्याचा आरोप केला आहे.
लोकांना पकडून त्यांना ओलीस ठेवण्यात येत आहे. अशी किमान 36 प्रकरणे नोंद झाली आहेत. रशियाचे सैनिक या लोकांना का घेऊन गेले हे त्यांच्या कुटुंबांना माहित नाही. या लोकांसंबंधी कुठलीच माहिती मिळाली नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
पत्रकाराचे अपहरण
15 मार्च रोजी पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमणाचे वृत्तांकन करणारी पत्रकार व्हिक्टोरिया रोशचिना हिचे अपहरण करण्यात आले. न्यूज इन्स्टीस्टय़ूट ‘होरोमाडस्के’ने रशियाच्या सेन्याने बर्दियांस्क शहरातून आपल्या पत्रकाराचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. 4 अन्य पत्रकारांनाही मेलिटोपोल मध्ये ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्सने दिली आहे. तर पत्रकार व्हिक्टोरिया रोशचिना यांना अपहरणाच्या 6 दिवसांनी सोडण्यात आले.
पत्रकाराचा पिता ओलीस
मेलिटोपाल शहरात रशियाच्या सैन्याने आपल्या 75 वर्षीय वडिलांना ओलीस ठेवल्याचा दावा पत्रकार स्वेतलाना जालिजेत्सकाया यांनी केला आहे. रशियाच्या प्रशासनासोबत सहकार्य करण्यास नकार दिल्याने शिक्षेदाखल माझ्या वडिलांना ताब्यात घेण्यात आल्याची ती म्हणाली.
रशियाविरोधी आवाज उठविल्यास लक्ष्य
स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी असलेल्या लोकांनाच रशियाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच रशियाच्या विरोधात आवाज उठविणाऱया लोकांना लक्ष्य केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे. अमेरिकेने फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला एक पत्र पाठवून रशिया युद्धादरम्यान युक्रेनमध्ये काही निवडक लोकांना मारून टाकणार आहे, तसेच काही लोकांना ताब्यात घेण्यात असणार असल्याचे म्हटले होते.
ताब्यात घेतलेल्या लोकांचा छळ
युक्रेनच्या अनेक अधिकाऱयांनाही रशियाच्या सैन्याने ओलीस ठेवले आहे. नोवा काखोवकाच्या सचिवाचे अपहरण करण्यात आले आहे. बुकामध्ये लोकल कौन्सिलच्या 6 कर्मचाऱयांना ओलीस ठेवण्यात आले. मेलिटोपोल शहराचे महापौर इवान फेडोरोव्ह यांचे रशियाच्या सैनिकांनी अपहरण केले होते. काही दिवसांनी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. ओलीस ठेवलेल्या लोकांचा छळ केला जात असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.