ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेली दहा दिवस झाले तरी रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. युक्रेन अन्य देशांच्या मध्यस्तीने युद्ध थांबविण्याचे आवाहन करत आहे. पण अजून कोणताही देश युद्ध थांबावे म्हणून पुढाकार घेण्यास तयार नाही. दरम्यान, युक्रेनने याआधी भारताला मध्यस्थी करण्याचे आवाहन केले होते. आता युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी शनिवारी ५ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बातचीत करून युक्रेनविरोधातील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. तसेच युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही, असं पुतिन यांना समजावून सांगा, अशी मागणी त्यांनी केली. कुलेबा म्हणाले की, “युक्रेन हा भारताच्या अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा देश आहे, त्यामुळे हे युद्ध थांबवणे भारताच्या हिताचे आहे.” असे ते म्हणाले.
भारत आणि रशिया यांच्यातील विशेष संबंधाकडे लक्ष वेधत कुलेबा म्हणाले, “भारताशी विशेष संबंध असलेले सर्व देश पुतिन यांना आवाहन करू शकतात. आम्ही पंतप्रधान मोदींना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यापर्यंत आमचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना समजावून सांगण्यासाठी विनंती करत आहोत. कारण हे युद्ध कोणाच्याच हिताचे नाही, असं त्यांनी म्हटलं. यावेळी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतातील निर्यातीसह जागतिक कृषी बाजारावरही आक्रमणाचा परिणाम होत असल्याकडे लक्ष वेधले. “आपण हे लक्षात घ्यायला हवं की, भारत हा युक्रेनियन कृषी उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि हे युद्ध असेच चालू राहिल्यास, नवीन पीक पेरणे आणि उत्पादन घेणे आपल्यासाठी कठीण होईल. त्यामुळे जागतिक अन्न सुरक्षा आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने, हे युद्ध थांबवणे महत्वाचे आहे,” असं ते म्हणाले.