ऑनलाईन टीम / पुणे :
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत शुक्ला यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीरपणे राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, राज्य सरकारने यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्ला यांना दोषी ठरवले आहे. शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचे या समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करत असताना नेत्यांना गुन्हेगारांचे ‘कोडनेम’ दिले होते. त्यानंतर त्यांचे फोन टॅपिंग केल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. यामध्ये नाना पटोले, बच्चू कडू आणि वर्षा गायकवाड यांना त्यांनी गुन्हेगारांची नावं दिली होती. त्यांच्या नावामार्फत फोन टॅप करण्यात आले. राजकीय नेत्यांना गुन्हेगारांची नावं कोणी द्यायला लावली आणि का दिली? याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जात आहे. असे असतानाच अटकेची कारवाई टाळण्यासाठी शुक्ला यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे.