संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडली भूमिका
संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था
दहशतवादी संघटनांपर्यंत रसायनास्त्रs पोहोचल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांकडे रसायनास्त्रs पोहोचल्याने केवळ भारतच नव्हे तर पूर्ण जगावर संकटाचे ढग घोंगावत असल्याचे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ति यांनी काढले आहेत. सीरिया (रसायनास्त्रs) विषयक संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्यांनी भारताची भूमिका मांडली आहे.
सीरियात सुरू असलेल्या संघर्षाचा दहशतवादी संघटना लाभ घेत आहेत. दहशतवाद विरोधातील लढाई कुठल्याही स्थितीत आम्ही कमकुवत करू शकत नसल्याचे तिरुमूर्ति यांनी म्हटले आहे.
भारताने नेहमीच सीरियातील संघर्षावर व्यापक तसेच शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या बाजूने भूमिका मांडली आहे. सीरियाच्या नेतृत्वाखाली चर्चा आणि तेथील लोकांना केंद्रस्थानी ठेवून समस्येवर तोडगा काढला जावा. कुठल्याही स्थितीत रसायनास्त्रांच्या वापराला भारत तीव्र विरोध करत असल्याचे ते म्हणाले.
भारताने सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून 1 जानेवारी रोजी स्वतःचा कार्यकाळ सुरू केला आहे. भारताचा हा कार्यकाळ 2 वर्षांचा राहणार आहे. भारत आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा सदस्य झाला आहे.