रसिक रंजनतर्फे शनिवार दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता पहाडी रागावर आधारित जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा दृकश्राव्य कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे संकलन डी. जी. कुलकर्णी यांनी केले आहे.
भारतीय अभिजात संगीत हे संपूर्ण जगातील कलाक्षेत्रातील अत्यंत पुरातन आणि मौल्यवान संचित आहे. त्याच्या पाठीमागे एक प्रगल्भ शास्त्र आहे. हे संगीत आजही आपल्या संस्कृतीचा अभिन्न हिस्सा आहे. प्रांत परत्वे, प्रदेश परत्वे, भाषा, राहणीमान, रुढी-परंपरा याला अनुसरून लोककला परिस्थितीनुरुप आपल्या विशालकाय देशात संगीतामध्ये विविध प्रकार पहावयास मिळतात. त्याचा प्रभाव हा अनाहुतपणे वर्तमान काळातील कलाक्षेत्रावर पडणे अपरिहार्यच आहे.
सुमारे नव्वद वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये बोलपट सुरू झाला. तोकडे तंत्रज्ञान असूनही मूकपटपासून संगीत सिनेमाला चिकटले ते कायमचेच. हा ब्रिटिश राजवटीचा काळ. पारतंत्र्यात खितपत असलेला समाज, स्वातंत्र्यलढय़ाचे धगधगते समर, जगावर घोंगावणारे महायुद्धाचे संकट या पार्श्वभूमीवर मनोरंजन अथवा करमणूक क्षेत्रातही क्रांतिकारक बदल होत होते. याचदरम्यान सिनेसंगीतही रसिक मनाचा ठाव घेत आकाराला येत होते. प्रतिभावान गीतकार, संगीतकार, गायक-गायिका यांच्या परिश्रमातून साकारणारी चित्रपटगीते रसिकांसाठी जीव की प्राण बनून गेली. तरीही या चित्रपटगीतांचा पिंड हा शास्त्राक्त संगीतावर आधारितच होता.
शास्त्राsक्त संगीत म्हणजे राग-रागिण्या याचा आधार घेत, गुलाम हैदर, पंकज मलिक, आर. सी. बोराळ, खेमचंद्र प्रसाद, पं. अमरनाथ, पं. ग्यानचंद, अनिल विश्वास बुलो सी रानी, सज्जाद, नौशाद, सी. रामचंद्र, गुलाम मोहम्मद, सचिनदा आणि अन्य महान संगीतकारांनी शास्त्राsक्त संगीताचा खुबीने वापर करून चित्रपट गीतांना अमरत्व प्राप्त करून दिले. या शास्त्राsक्त संगीतातील एक कमालीचा लोकप्रिय आणि असामान्य असा राग म्हणजे ‘पहाडी’.
त्या-त्या प्रदेशातील गुराखी, धनगर अथवा अन्य भटक्मया जमातींनी स्वतःच्या करमणुकीसाठी ज्या गीतांच्या रचना केल्या वा त्या-त्या ठिकाणच्या प्रचलित वाद्यांवरील ज्या ‘धून’ तयार केल्या त्या सर्व संगीताची गोळाबेरीज म्हणजे पहाडी संगीत वा पहाडी राग. त्याला मातीचा गंध आहे. निसर्गाचा स्पर्श आहे. भावनेचा ओलावा आहे. मानवतेची आच आहे आणि मुख्य म्हणजे एक अद्भूत असा गोडवासुद्धा आहे.
‘मेरे नैनो मे बस गया कोई रे’ मोहे नींद न आये मै क्मया करू’ किंवा ‘हवा मे उडता जाये मोरा लाल दुपट्टा मलमलका’ ही गाणी म्हणजे पहाडी रागाचा रंगगंध घेऊन प्रकटलेली गीते आहेत. जवळपास सर्वच संगीतकारांनी गाण्यांना चाली लावताना पहाडी रागाचा मुक्तहस्ते वापर केला. डोंगर-दऱया, कडे-कपाऱयापासून भव्यदिव्य दिवाणखान्यापर्यंत या रागाचा वावर आपल्याला आढळून येतो. तो जसा गुराखी धनगरांना आवडतो तसाच तो प्रतिष्ठतांनाही भावतो. त्यात लोकसंगीताच्या, लोकगीताच्या असंख्य छटा प्रकट होतात.
नूरजहाँ, जोहराबाई, सरैय्या, गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, आशा भोसले, रफी, हेमंतदा, मुकेश, मन्नादा, किशोर कुमार, तलत मेहमूद, सुबिर सेन आदी गायक-गायिकांची 1948 सालापासूनची अजरामर गाणी रसिकांना ऐकायला आणि पाहायलादेखील (काही अपवाद सोडून) मिळणार आहेत.
रसिक रंजनने पुनश्च दिमाखदारपणे पुनरागमन केले असून ज्या रसिकांनी आपली नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तत्काळ करून घ्यावी. त्याचप्रमाणे त्या-त्या कार्यक्रमाच्या अतिथी देणगी पत्रिकाही कार्यक्रमस्थळी उपलब्ध असतील. अधिक चौकशीसाठी कार्यालयीन वेळेत लोकमान्य रंगमंदिरास भेट द्या आणि माहिती घ्या. यानंतर पुन्हा एकदा आपल्या आयुष्यास नवा आकार देऊया, संगीताचे रंग भरून आनंद लुटूया!
-अनिल चौधरी