डांबरीकरणाचे काम 20 नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्याची केली होती सूचना : रस्त्याअभावी वाहनधारकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. पण कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे ही कामे रखडली होती. सदर कामे 20 नोव्हेंबरपूर्वी सुरू करण्याचा आदेश मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मनपा अधिकाऱयांना बजावला होता. पण अद्याप शहरात एकाही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले नाही.
शहरातील समस्या आणि महापालिकेकडून राबविण्यात येणाऱया विकासकामांची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी मागील आठवडय़ात मनपा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा करून विकासकामांचा आढावा घेतला होता. एसएफसी विशेष अनुदानांतर्गत विविध रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे राबविण्यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिली होती. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 25 कोटांची तरतूद करून निविदा काढण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. पण कोरोना विषाणूंचा प्रसार वाढल्याने ही कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे डांबरीकरणाचे काम रखडले असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली होती. त्यामुळे ही कामे तातडीने सुरू करून रस्त्यांचा विकास करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला होता. 20 तारखेपूर्वी ही कामे सुरू करावीत. दर्जेदार रस्ते बनविण्यावर भर द्यावा, अशा विविध सूचना जिल्हाधिकाऱयांनी केल्या होत्या. कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरी हवी असल्यास कार्यालयात या, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते. पण 20 तारीख उलटली तरी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम कधी सुरू करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शहरातील अंतर्गत रस्ते आणि उपनगरांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेतील रस्ते वगळता महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठय़ा खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील डांबर उखडून गेल्याने केवळ खडी आणि दगड-माती शिल्लक राहिली आहे. परिणामी वाहनधारकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी डेनेज वाहिनी जोडणीसाठी आणि नळ जोडणीसाठी तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेले रस्ते खराब झालेले आहेत. रस्त्यांवर मोठमोठय़ा चरी निर्माण झाल्याने वाहनचालकांना धोकादायक बनले आहे. काही ठिकाणी खड्डय़ांमुळे अपघातही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारींचे निवारण करण्यासाठी रस्त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. पण महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाकडे कानाडोळा केला आहे.