तिसऱया रेल्वे फाटक परिसरातील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. उड्डाणपुलाची उभारणी करताना वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली असून, रॅम्पच्या उभारणीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे तिसरे रेल्वे फाटक परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सध्या एका बाजुचा रस्ता खुला असून, दुसऱया बाजुच्या रस्त्यावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. खुल्या असलेल्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असते. पण रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांची गर्दी या परिसरात होऊन वाहतूक कोंडी निर्माण होण्याचा प्रकार सातत्याने घडत असतो. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करताना वाहनधारकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावर विविध साहित्य पसरले आहे. तसेच लोखंडी सळय़ा आणि गर्डर ठेवले आहेत. अलीकडेच रॅम्पच्या उभारणीसाठी लोकमान्य सोसायटीच्या समोर रस्ता खोदण्यात आला आहे. या ठिकाणी दुभाजक असल्याने वाहनधारक ये-जा करीत होते पण अलिकडेच हा रस्ता खोदण्यात आला असून, याची कल्पना नागरिकांना येत नाही. रस्ता खोदल्यानंतर वाहनधारकांना समजण्यासाठी जागृती फलक किंवा बॅरिकेड्स लावून वाहने जावू नयेत यादृष्टीने खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. पण याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने वाहनधारांना धोकादायक बनले आहे. रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाने कानाडोळा केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.