हीच स्मार्ट सिटी का? नागरिकांचा प्रश्न : आरपीडी कॉर्नरवरील प्रकार : महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात गटारींचे बांधकाम, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डेकोरेटिव्ह पथदीप आदीकरिता कोटय़वधीचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र ठिकठिकाणी साचणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीकडून कोणत्याच उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी आरपीडी कॉर्नरवरील सांडपाण्याचा खड्डा भरून आता मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहू लागले आहे. त्यामुळे हीच स्मार्ट सिटी आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शहर स्मार्ट बनविण्यासाठी एक हजार केटीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण शहराची स्थिती पाहता काही ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नाही. तर काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नेमका स्मार्ट सिटी बनविण्याचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून डेकोरेटिव्ह पथदीप आणि गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. पण अन्य विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच काही भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची तसदी घेण्यात आली नाही.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरपीडी रोडचा विकास करण्यात आला असून रस्त्याशेजारी गटारीचे बांधकाम, रस्त्याचे काँक्रिटीकरण, दुभाजक, फूटपाथ आणि डेकोरेटिव्ह पथदिपांची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. पण गटारीमधून वाहणाऱया सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे आरपीडी कॉर्नरवर खड्डय़ामध्ये सांडपाणी साचत आहे. मुख्य रस्त्याशेजारी असलेला हा खड्डा तुडुंब भरला असून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
खानापूर रोडवर मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच कॉलेजला ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सांडपाण्याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱयांना सहन करावा लागत आहे. तसेच दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मनपा-स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबाबत नागरिकांतून संताप
रस्त्याच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी कंपनीकडून करण्यात येत असल्याने महापालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर समस्येचे निवारण कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांच्या कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील रस्त्यावरून वाहणाऱया सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.