बैठकीत बगलरस्त्याची मागणी, दुर्लक्ष केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
वार्ताहर /केपे
काराळी ते तिळामळपर्यंत या केपे पालिका भागातील रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरुवात झाली असून याला कुस्मण भागातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी बैठकही घेतली असून बगलरस्त्याची मागणी केली आहे.
केपे पालिका क्षेत्रामध्ये काराळी ते तिळामळपर्यंत सुमारे 15 कोटींच्या आसपास खर्च करून रस्ता रूंद करण्यात येत असून तिळामळ ते कट्टा-आमोणापर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत काराळी ते केपे पोलीस स्थानकापर्यंतच्या कामालाही सुरुवात केली आहे. मात्र कुस्मण भागातील लोकांनी या रस्ता रूंदीकरणाला विरोध दर्शविला असून यासंबंधी ग्रामस्थांनी रविवारी बैठकही घेतली. यात 90 टक्के लोकांनी विरोध दर्शविला असून रस्ता रूंदीकरणासंदर्भात योग्य ती प्रक्रिया करण्यात आलेली नाही व विश्वासात घेतलेले नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कुस्मण भागातील सुमारे 35 घरांना या रस्ता रूंदीकरणाचा फटका बसत आहे
तसेच रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून कोळसा वाहतूकही होत आहे. रस्ता रूंदीकरणामुळे या मार्गावरून जाणारी वाहने आणखी वाढू शकतात. त्यामुळे येथील लोकांना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो, असे मत या बैठकीत व्यक्त झाले. कारण काही वर्षांपूर्वी एकाच्या घरात ट्रक घुसून मोठी हानी झाली होती. तसेच रस्ता रूंदीकरणात कुस्मण भागातील काहींची घरे, काहींच्या संरक्षक भिंती जाणार असून सुमारे दीड ते दोन मीटर इतका रस्ता रूंद करण्यात येत असल्याचे कळते. तीन वर्षांपूर्वी केपे पालिकेच्या बैठकीत रस्ता रूंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याचे ठरवले होते. मात्र अचानक रूंदीकरणाचे काम सुरू झाल्याने ही बैठक घेऊन विरोध दर्शविण्यात येत असून बगलरस्त्याची मागणी करण्यात येत आहे. जर याकडे दुर्लक्ष केले, तर न्यायालयात जाऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीस क्लायफ कुलासो, वल्लभ प्रभुदेसाई, सॅबेस्तिना गोयस, मारयानी डिसिल्वा, अंबादास शिरवईकर व इतर हजर होते. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, आपण यासंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितलेली असून रस्ता रूंदीकरण करताना कोणतीच प्रक्रिया केलेली नाही व लोकांनाही विश्वासात घेतलेले नाही. तसेच काराळी-तिळामळदरम्यान जे काम सुरू आहे तेथे मधोमध वीजखांब आहेत. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्मयता जास्त आहे. तसेच काही ठिकाणी जलवाहिनी असून ती हलविण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कुलासो यांनी सांगितले की, कुस्मण हा निवासी भाग असून बहुतेक लोकांनी विरोध दर्शविला आहे. कारण रात्रीच्या वेळी कोळसा वाहतूक होत असते. रूंदीकरण झाल्यानंतर ती आणखी वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बगलरस्ता करावा जेणेकरून लोकांच्या जमिनी व घरांना फटका बसणार नाही, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात ते पाहण्यासारखे आहे.