उत्तरे देताना साबांखामंत्र्यांचा प्रचंड गोंधळ : मुख्यमंत्र्यांनीच वारंवार हस्तक्षेप करत केले विरोधकांना शांत
प्रतिनिधी /पणजी
पती-पत्नी दुचाकीवरून जात असतील तर पतीला दुचाकी चालविण्यापेक्षा पाठीमागे बसलेली पत्नी जागेवर आहे की कोणत्यातरी खड्डय़ात पडून हरवली त्याचा वारंवार अंदाज घ्यावा लागतो, अशा शेरेबाजीच्या भाषेत विरोधी पक्षनेता दिगंबर कामत यांनी राज्यातील रस्त्यांच्या दैनावस्थेचे चित्र विधानसभेत उभे केले. त्यातून संपूर्ण सभागृहात हास्याचे जोरदार फवारे उडाले, परंतु मंत्री दीपक पाऊसकर हा नजारा निर्विकारपणे पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत. विधानसभेत एकामागून एक विरोधक रस्त्यांच्या स्थितीसाठी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असतानाही ते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर समाधानकारकरित्या देऊ शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करत स्वतः उत्तरे देणे भाग पडत होते.
प्रश्नोत्तर तासास सर्वात प्रथम राज्यातील पत्रादेवी ते काणकोणपर्यंत सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गांची दर्जाहिन कामांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या विषयावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. त्यातील एकाही आरोपावर मंत्री पाऊसकर समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते. विरोधकांचा प्रश्न एक तर मंत्र्याचे उत्तर भलतेच, त्यातून मग पुन्हा हल्लाबोल असे चित्र दिसत होते. वेळ मारून नेण्यासाठीच हा खेळ चालला आहे की काय असेच वाटत होते. त्यामुळे प्रत्येकवेळी मुख्यमंत्री हस्तक्षेप करत स्वतः उत्तर देण्याचे प्रयत्न करत होते.
बेजबाबदार कंटात्रदारांवर कठोर कारवाई करा : खंवटे
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे सरकारला कोंडीत पकडणारच म्हणून चांगल्या तयारीनिशी आले होते. पेडणे ते म्हापसा या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामादरम्यान भूमिगत वीज केबल तोडून टाकण्यात आले आहेत. पाण्याची पाईप फोडून टाकली आहे, रस्त्याबाजूची शेती मातीने बुजवून टाकली आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
या रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे 2009 मध्ये 1160 अपघात घडले असून 66 जणांचे बळी गेले आहेत. रस्त्यांची स्थिती एवढी वाईट असतानाही सरकार कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप करत खंवटे यांनी युपी सरकारने तेथील बेजाबदार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले होते याचे उदाहरण खंवटे यांनी दिले. त्याच पद्धतीने गोवा सरकारनेही कारवाई करावी, अशी मागणी केली.
रस्त्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत : मंत्री पाऊसकर
त्यावर बोलताना मंत्री पाऊसकर यांनी सदर कंत्राटदाराबद्दल अनेक तक्रारी पोहोचल्याचे मान्य केले. तसेच त्यासंबंधी दोन वेळा त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या रस्त्याचे काम जोरात सुरू असून ते काम दर्जेदार होईल याकडे सरकारचे लक्ष आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले. रस्त्याच्या कामासाठी अडथळा ठरणाऱया पाईप स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासनही पाऊसकर यांनी दिले.
यंदाच्या वर्षीच खड्डे बुजविण्यात येतील : मुख्यमंत्री
दरम्यान, 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, या आपल्या आश्वासनाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुनरुच्चार केला. त्यावेळी विजय सरदेसाई यांनी केवळ तारीख सांगू नका, वर्षही सांगा, असा आग्रह धरला. त्याना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षीच खड्डे बुजविले जातील, असे स्पष्ट केले.
सर्व रस्ते प्राधान्याने पूर्ण करून घ्या ः कामत महामार्गावर बांधण्यात येणाऱया फ्लायओव्हरच्या कामांवरून दिगंबर कामत यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. फ्लायओव्हर बांधताना त्याखालील रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल याकडे संबंधित कंत्राटदार आणि साबांखाचे अभियंतेही लक्षच देत नसल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलो. हे रस्ते वाहन चालविण्यायोग्य ठेवणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असल्यामुळे सरकारने त्यांच्याकडून सर्व रस्ते प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, त्यासाठी प्रसंगी त्यांचे काम बंद ठेवावे लागले तरी चालेल, रस्ते दुरुस्त करून घ्यावे, अशी जोरदार मागणी कामत यांनी केली.