बेंगळूर महापालिकेचा निर्णय : वाहनधारकांना दिलासा
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमध्ये रस्त्यांवरील खड्डे ही अनेक दशकांपासूनची मोठी समस्या आहे. या खड्डय़ांमुळे अनेक जणांचे प्राण गेले आहे. दरम्यान, बेंगळूर महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहन अपघात झाल्यास भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. तर अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. महापालिकेनेच यासंबंधी माहिती दिली आहे.
बेंगळूरमध्ये निकृष्ट रस्ते व खड्डय़ांमुळे अपघात झाल्यास वाहनमालकाने अर्ज केल्यास भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी दिली. यापूर्वी खड्डय़ांमुळे अपघात झालेल्यांना भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला होता. त्यामुळे भरपाईसाठी मार्गसूची तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच भरपाईसाठी अर्ज करणाऱयांची कागदपत्रे पडताळण्यासाठी महापालिकेने महसूल विभागाच्या विशेष आयुक्तांची नेमणूक केली आहे. किरकोळ जखमींना 5 हजार रुपये, तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधीच्या उपचारासाठी 10 हजार रु. गंभीर जखमींना 15 हजार रु. देण्याची घोषणा केली आहे.